प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आले आहेत. सरकारी नियमांचे पालन करीत गणेशचतुर्थी दिवशी भक्तीभावाने श्रीची प्रति÷ापना करण्यात आली आहे. आता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करीत मंगळवारी सायंकाळी पाचच्या आत श्री विसर्जन करण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांनी केली.
रविवारी मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या कार्यालयात गणेशोत्सव महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत नेताजी जाधव, रणजित चव्हाण-पाटील, बाबुलाल राजपुरोहित, विजय जाधव, सुनील जाधव, मदन बामणे, रमेश सोंटक्की आदींसह तिनही गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री विसर्जनाच्या दिवशी सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत विसर्जन करावे. यंदा मिरवणूक असणार नाही. वाद्ये, रोषणाईलाही फाटा देण्यात आला आहे. मंडपात आरती व पूजन झाल्यानंतर वाहनातून जवळच्या तलावात आणून श्रीचे विसर्जन करण्यात यावे. या वाहनात मंडळाचे केवळ पाच पदाधिकारी असावेत, अशी सूचना पोलीस अधिकाऱयांनी केली आहे.
सरकारी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन तलावावर महानगरपालिकेचे कर्मचारी असणार आहेत. तलावावर पूजन केल्यानंतर सदर कर्मचारीच मंडळांच्या श्रीमूर्तींचे विसर्जन करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनासाठी पाण्यात उतरू नये. यासंबंधी पदाधिकाऱयांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहनही एसीपी एन. व्ही. बरमणी यांनी केले.