प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या वाढत आहे. पण पार्किंगकरिता आवश्यक पार्किंग तळ नसल्याने समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत. गल्ली-बोळात दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हॉकर्स व नॉन-हॉकर्स झोनप्रमाणे पार्किंग व नो-पार्किंग झोनची घोषणा करून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
शहरातील विविध ठिकाणी आणि रस्त्यांवर फेरीवाले व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. काही ठिकाणी दुकानांच्या पायरीवर भाजी विपेते ठाण मांडत असल्याने व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरांतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून हॉकर्स व नॉन-हॉकर्स झोनची घोषणा केली आहे. अडचणीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येचे निवारण होणार असून फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगसंदर्भात महापालिका आणि रहदारी खात्याने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शहर आणि उपनगरांतील प्रत्येक रस्त्यावर पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
सध्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. शहरात व्यापाराकरिता येणाऱया नागरिकांची वाहने, नोकरी व व्यवसायानिमित्त येणाऱयांची वाहने असल्याने शहरातील प्रत्येक रस्त्याशेजारी वाहनांच्या रांगा लागत आहेत. व्यापारी संकुलांसमोर ग्राहकांऐवजी नोकरवर्गाच्या दुचाकी पार्क केलेल्या असतात. त्यामुळे खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, पांगुळ गल्ली अशा ठिकाणी बाजारात येणाऱया नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत. सुशिक्षित असो वा अशिक्षित वाहन कुठे पार्क करायचे याचे भान त्यांना नसते. वाहतुकीस अडथळा होईल याचा कोणीच विचार करीत नाही. अलीकडे नो-पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत आहेत.
रहदारी पोलीस खात्याने नो-पार्किंग, एकेरी मार्ग तसेच ऑड-इव्हन पार्किंगची घोषणा केली आहे. पण त्यानुसार अंमलबजावणी होत नाही. नो-पार्किंगच्या ठिकाणी सरकारी अधिकाऱयांची वाहने पार्क करण्यात आल्याचे निदर्शनास येते. शहरातील काही रस्ते अरुंद असल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. पार्किंग करण्यात आल्यास अडथळा निर्माण होण्याची शक्मयता असल्याने नो-पार्किंग झोन करण्यात आले आहेत. पण यानुसार कार्यवाही होत नाही. त्यामुळे अरुंद असलेल्या रस्त्यांवर दुतर्फा दुचाकी वाहने पार्क करण्यात आल्याचे निदर्शनास येते. बाजारपेठेचा भाग म्हणून ओळखला जाणारा अरळीकट्टी-देशपांडे गल्लीचा रस्ता खुपच अरुंद आहे. पण या गल्लीत औषधे पुरवठा करणाऱया फार्मसी कंपनीची कार्यालये असल्याने मेडिकल प्रतिनिधींची गर्दी असते. त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूने दुचाकी वाहने पार्क करण्यात येतात. औषधे पुरवठा करणाऱया वाहनांची गर्दी होत असल्याने या गल्लीतील रस्ता सर्वसामान्यांसाठी बंद झाला आहे. नरगुंदकर भावे चौकामधून अरळीकट्टी-देशपांडे गल्लीत प्रवेश करण्याच्या ठिकाणी रस्ता अरुंद असतानाही या परिसरात दुचाकी वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
मारुती गल्ली, गणपत गल्ली आणि कलमठ रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली, किर्लोस्कर रोड आणि शहापूर परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासाठी कोणतीच शिस्त नाही. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा आणि उपलब्ध असलेल्या ठिकाणी दुचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत.
रविवार पेठ, रामलिंगखिंड गल्ली आणि पाटील गल्ली रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पण रस्त्यावर निर्माण होणाऱया समस्या पाहता रुंदीकरण कशाकरिता करण्यात आले, असा मुद्दा उपस्थित होत आहे. रामलिंगखिंड गल्लीतील रस्त्यावर दोन्ही बाजूने चार चाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण पार्किंगकरिता करण्यात आले का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. पाटील गल्लीच्या रस्त्यावर अक्षरश: बाजार मांडला जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाले खरे पण याचा सदुपयोग होतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहापूर-अनगोळ भागातदेखील पार्किंगची समस्या भेडसावत आहे. खडेबाजार शहापूर हा रस्ता बाजारपेठेचा असल्याने नेहमी गर्दी असते. पण परिसरात पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहनधारकांची गैरसोय होते. परिणामी शहापूर-खडेबाजार रस्त्याला जोडणाऱया विविध गल्ल्यांमध्ये वाहने पार्क करण्यात येत आहेत. या ठिकाणी असलेल्या गल्लीमध्ये दुतर्फा दुचाकी व चार चाकी वाहने पार्क करून नागरिक खरेदीसाठी जातात. त्यामुळे काही नागरिकांना घरातून आपले वाहन काढणेही मुश्कील होते. येथील गल्ल्या पार्किंग तळ बनत आहेत. महात्मा फुले रोड हा महत्त्वाचा रस्ता आहे. पण या ठिकाणीदेखील कोणतीच शिस्त नाही. त्यामुळे वाहने अस्ताव्यस्तपणे पार्क करण्यात येतात. बॅ. नाथ पै चौक, आनंदवाडी रोड, वडगाव रोड आणि खासबाग रोड हा परिसरदेखील नागरिकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेला असतो. परिसरात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असूनही या ठिकाणीही कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही.
टिळकवाडी हा परिसरही महत्त्वाचा आहे. या भागात आता वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषत: देशमुख रोड, शुक्रवार पेठ, खानापूर रोड या परिसरात नागरिकांची रेलचेल मोठय़ा प्रमाणात असते. पण या भागात पार्किंग तळ नसल्याने वाहने पार्क करण्याची समस्या निर्माण होते. कोणत्याही ठिकाणी वाहने पार्क करून नागरिक निघून जातात. आरपीडी कॉर्नर ते गोमटेश कॉलेजपर्यंत रस्त्याशेजारी विविध महाविद्यालये आहेत. या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी पाहून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. पण या रस्त्याच्या दुतर्फा आता वाहनांच्या रांगा लागत आहेत. महाविद्यालयात येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याकडे दुचाकी वाहन असते. महाविद्यालय आवारात विद्यार्थ्यांना वाहने पार्क करण्यास मनाई आहे. त्यामुळे या रस्त्याच्या शेजारी दुचाकी वाहने पार्क करण्यात येतात. परिणामी या रस्त्याचे रुंदीकरण पार्किंगकरिता झाले का? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
शहर आणि उपनगरांतील पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या पाहता आवश्यक नियमावली करणे गरजेचे आहे. ठिकठिकाणी नो-पार्किंग, एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. पण याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. शहर आणि उपनगरात नव्याने बाजारपेठा निर्माण झाल्या आहेत. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक परिसराची माहिती घेऊन व त्या ठिकाणी निर्माण होणाऱया समस्यांचा आढावा घेऊन पार्किंग झोन, नो-पार्किंग झोन, एकेरी वाहतूक व पार्किंग तळ निर्माण करण्याची गरज आहे. याकरिता महापालिका आणि रहदारी खात्याने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.