ऑनलाईन टीम / लखनऊ :
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी कायदे केले. मात्र, शेतकऱ्यांना ते समजले नाहीत. सरकारही ते समजावून सांगण्यास कमी पडले. त्यामुळे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, गरज पडल्यास हे कायदे पुन्हा लागू केले जाऊ शकतात, असे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील भडोही येथे मिश्रा माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदेलन सुरू होते. सरकारने शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकरी कायदे रद्द करण्यावर ठाम राहिले. या कायद्यांसाठी ही वेळ अनुकूल नव्हती. त्यामुळे केंद सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. गरज पडल्यास सरकार हे कृषी कायदे पुन्हा आणू शकते.