शासनाच्या शिवभोजन चालकांची व्यथा,
प्रतिनिधी/ चिपळूण
शासनाने राज्यभर सुरू केलेल्या शिवभोजन केंद्रांच्या लॉकडाऊन काळात गरिबांना मोठा फायदा झाला. मात्र याच गरिबांची भूक भागवणारे चालक मात्र पैशासाठी उपाशी आहेत. त्यांना काही दिवसापूर्वीच केवळ 20 दिवसांचे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात अन्नदाते बनलेल्या या चालकांचे सर्व बिल देण्यासाठी शासनाने तत्काळ प्रयत्न करण्याची गरज आहे. कमी पैसे मिळाले म्हणून ते नाराज नसून आजही त्याच जोमाने आपली सेवा त्यांनी अखंडित ठेवली आहे.
गेल्या 4 महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती बिकट झाली आहे. सुरूवातीला अनेक महिने लॉकडाऊन राहिल्याने सर्वांसह गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात 848 शिवभोजन केंदे सुरू केली. त्याचा आजपर्यंत 88 लाखाहून अधिक गरजूंना लाभ झाला आहे. रत्नागिरी जिल्हय़ाचा विचार करता येथे 13 केंद्रे आहेत. त्यात रत्नागिरीतील हॉटेल मंगला, डी. एम. एन्टरप्रायझेस, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, हॉटेल सिद्धीविनायक साळवी स्टॉप, आंबेडकर उपाहारगृह, देवरूख, आनंदी भोजनालय बसवेश्वर चौक लांजा, हॉटेल अंगण एस.टी. बस स्टँड खेड, कॅफे कॉर्नर पोलीस स्टेशनजवळ खेड, एकी उपहारगृह राजापूर, श्रीदेवी कॅटरर्स बहादूरशेख नाका चिपळूण, एसटी कॅन्टीन जुना स्टँड चिपळूण, श्री समर्थ कृपा बचत गट तहसील कार्यालय दापोली, सिवीन सुगरण दुर्गा श्री महिला बचत गट वरचा पाट गुहागर यांचा समावेश आहे.
राज्यात जानेवारीपासून ही केंद्र सुरू झाली असली तरी जिल्हय़ातील अनेक केंद्र ही एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. त्यामुळे अडचणीच्या काळातच सुरू झालेल्या या केंद्रांवर दरदिवशी मोठी गर्दी दिसून येत होती. आता परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी गेल्याने ही गर्दी थोडी कमी झाली असून आजही ठरवून दिलेले थाळय़ांचे उद्दीष्ट पूर्ण होत आहे. त्यामुळे या केंद्रांचा कायमच गरिबांना मोठा फायदा होणार आहे. चिपळुणातील 2 केंद्राचा विचार करता येथे गरिबांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 5 रूपयात थाळी मिळत आहे. मात्र पडत्या काळात 5 रूपयेही गरिबांकडे नसल्याने सुरूवातीला या पैशाची जबाबदारी निराधार फाऊडेशनने घेतली. त्याप्रमाणे आजही अनेकजण लग्नाचा वाढदिवस, मुलांचा वाढदिवस, पक्षांचे, नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा येथे थाळीचे पैसे अदा करून एक वेगळा पायंडा पाडत आहेत. त्यामुळे गरिबांना मोफत जेवण मिळत असून केंद्रचालकांना मोठा फायदा होत आहे.
जिह्यात 13 केंद्रांवर दरदिवशी 1 हजार 425 शिवभोजन थाळ्य़ांचे वाटप होते. ही थाळी गरिबांना दानशूरांनी पैसे भरल्यास मोफत तर अन्यवेळी 5 रूपयांना मिळते. शासन या व्यतिरिक्त शहरी भागातील चालकांना 45 रूपये तर ग्रामीण भागातील चालकांना 30 रुपये देणार आहे. मात्र अनेक महिने झाले तरी संबंधित चालकांना केवळ 20 दिवसांचे पैसे शासनाने दिले आहेत. त्यामुळे हे अन्नदाते पैशासाठी उपाशी असून त्यांना वेळेत पैसे देण्याची खरी गरज आहे.