ऑनलाईन टीम / मुंबई
देशभरात कोरोना लाटेने उग्र रुप धारण केले आहे. तसेच दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. अशी देशभरात चिंताजनक स्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांना मात्र मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस आहे. अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
नाना पटोले यांनी आपल्या पत्रकाद्वारे केंद्र सरकारवर टीका करताना असे म्हटले आहे की, गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभा राहत निवडणुकीचा खेळ खेळणारा पंतप्रधान देशाने आजपर्यंत पाहीला नाही, भारताचा इतिहास याची मात्र निश्चित नोंद घेईल अशीही त्यांनी टीका केली.
कोरोना महामारीची चाहूल लागताच केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या महामारीची जाणीव करुन देत सकारात्मक उपाय ही सुचवले होते, मात्र केंद्र सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आपलाच होरा पूढे ढकलला आहे. ज्याच्यामूळे देशात सद्य स्थितीत हजारो चिता जळतानाचे दुर्दैवी चित्र पाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे. मोदीं सरकारने आतातरी जागे होत देशातील १३० कोटी नागरिकांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी यात म्हटल आहे.
देशात कोरोना मृत्यूने थैमान घातले असताना नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मात्र पाच राज्यातील निवडणूकीत दंग आहेत. कोरोना संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा केंद्राला सकारात्मकरित्या उपाय सुचवले आहेत.
यापैकी जगभरात उपलब्ध असणाऱ्या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी यांनी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणि नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. सरकारने त्यावर विचार करून तातडीने आवश्यकते निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.