प्रतिनिधी / सांगली
देशात मागणी वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था ठाकठीक करण्यासाठी केंद्रसरकारने पावले उचलली पाहिजेत. उद्योजकांना कामगार पगारासाठी मदत केली पाहिजे आणि राज्यसरकारने गरीब, अतीगरीब व हातावर पोट असणाऱयांना महिना चार हजार मदत केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अनौपचारिकपणे ते बोलत होते.
भारतीय अर्थव्यवस्था गेली दोन वर्षे मंदीत आहे. कोरोनामुळे सकळ राष्ट्रीय उत्पन्नात वजा पाच ते दहा टक्के दणका बसेल. त्याचा सर्वच क्षेत्रावर वाईट परिणाम होईल. असे सांगून देवस्थानचे सोने, कर्ज व उपलब्ध सर्व मार्ग अवलंबून बाजारात मागणी व विश्वास निर्माण केला पाहिजे. असे स्पष्ट करत चव्हाण म्हणाले कोरोनाचे संकट आहेच जोडीला चीन, नेपाळ, पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. चीन मालावर बहिष्कार संपूर्णतः शक्य नाही. चीनची अर्थव्यवस्था आपल्या पाचपट आहे. अनेक उद्योग व्यवसाय चीनच्या कच्या मालावर अवलंबून आहेत.
ते म्हणाले देश, देशाच्या सीमा व कोरोना संकट या पार्श्वभूमीवर आपण सारे एकसंध आहोत. पण राहुल गांधींनी वीस जवानाच्या बलिदानानंतर उभे केलेले प्रश्नही महत्त्वाचे आहेत. आरोग्य साधन सुविधांसाठी जागतिक बँक व आरोग्य संघटना यांची मदत व अर्थसहाय्य घेतले पाहिजे. पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोण कायमचा शत्रू वा मित्र नसतो. परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था या संदर्भात गंभीरपणे चिंतन व ठोस निर्णय केले पाहिजेत. पगार मिळणार का? नाही यांची आज कुणालाच खात्री नाही. सारे साशंक आहेत यातून अर्थव्यवस्था खूप मागे पडेल. महाराष्ट्रात भाजपा नको म्हणून काँग्रेस महाआघाडी सोबत आहे. काँग्रेस नेते दोन दिवस मुख्यमंत्री भेटीसाठी वेंटींगवर हे खरे नाही. मुख्यमंत्र्यांचे निकटचे नातेवाईक निधन पावले होते. आता चर्चा होईल. काँग्रेसच्या वाटय़ाला विधानपरिषद चार जागा येतील. त्या पैकी एक जागा दक्षिण महाराष्ट्राला मिळावी असा प्रयत्न आहे. पक्षपातळीवर विचार करुन श्रेष्ठी निर्णय करतील असेही ते म्हणाले.