केंद्रीय सामाजिक न्याय-सक्षमीकरणमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / वास्को
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे देशात भूमी मुक्ती आंदोलनाला दि. 25 पासून सुरवात करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने देशभरातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पाच एकर जमीन मोफत देण्याची मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सामाजिक सशक्तीकरण खात्याचे मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे विविध कामानिमित्त गोव्यात दाखल झालेले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी देशातील ग्रामीण भागातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना शेती करता यावी यासाठी किमान पाच एकर जमीन उपलब्ध होण्याची आवश्यकता व्यक्त केली. येत्या दि. 25 पासून देशात आरपीआयतर्फे भूमी मुक्ती आंदोलनाला प्रारंभ करण्यात येणार आहे. या निमित्ताने आपण केंद्र सरकारकडे देशातील प्रत्येक राज्यातील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना शेतीसाठी पाच एकर जमीन मोफत देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. गोव्यातही अशी गरज आहे. मात्र, गोव्याकडे तेवढी जमीन उपलब्ध नसल्यास किमान तीन एकर जमीन गरीबांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा असे ते म्हणाले.
कृषी कायदे शेतकऱयांना अधिक सक्षम बनवतील
केंद्रीयमंत्री आठवले यांनी केंद्र सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे अत्यंत महत्वाचे असून हे कायदे शेतकऱयांना अधिक सक्षम करणार आहेत. शेतकऱयांचाही या कायदय़ांना पाठींबा आहे. मात्र, काही शेतकऱयांची काही लोक दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे ते आंदोलनात उतरले आहेत. या आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली आहे. आंदोलनाची अडवणूक केलेली नाही. आतापर्यंतच्या सर्व रॅलींनाही परवानग्या दिलेल्या आहेत. परंतु या आंदोलनात आंदोलक शेतकऱयांनी देशाचा अपमान केल्याचे मंत्री आठवले यांनी नमूद केले. अबांनी आणि अदानीसारख्या उद्योगपतींच्या हितासाठी कृषी कायदे बनवण्यात आलेले आहेत असा विरोधकांकडून गैरसमज पसरवण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
गोव्याच्या विधानसभेसाठी दोन जागांची मागणी करणार
यावेळी आठवले यांनी गोव्य़ात आरपीआयचे दहा हजार सदस्याचे सांगितले व ही सदस्य संख्या एक लाखपर्यंत करण्याचे उद्दीष्ठ असल्याचे ते म्हणाले. गोव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आरपीआयला दोन मतदारसंघ द्यावेत अशी मागणी करण्यात येणार असल्यचीही माहिती त्यांनी दिली. गोव्यात आंबेडकर भवन उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न सरकार करीत असल्याचे ते म्हणाले. यावेळी आरपीआयचे केंद्रीय सचिव बाळासाहेब बनसोडे, गोवा प्रदेश अध्यक्ष सतिष कोरगावकर, कार्याध्यक्ष उमेश हसापूरकर, पक्षाच्या केरळ प्रदेशचे पदाधिकारी राजीव मेनन व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.