झारखंड राज्याच्या देवघर जिल्हय़ाच्या जिल्हाधिकाऱयांनी जिल्हय़ातील गरीब मुलांसाठी अनोखी योजना साकारली आहे. कोरोना उदेकामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यासाठी स्मार्टफोनची आवश्यकता असते. गरीब आईबापांच्या मुलांना तो परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची परवड होत आहे. जिल्हाधिकारी या नात्याने ही बाब ध्यानात येताच त्यांनी जिल्हय़ातील सर्व गरीब शाळकरी मुलांना स्मार्टफोन देण्याची सोय केली आहे. मंजुनाथ भजंत्री असे त्यांचे नाव आहे.
गेल्या 22 आणि 24 जूनला त्यांनी जिल्हय़ातील अशा अठराशे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्याची आपल्याकडे स्मार्टफोन नाही, हीच तक्रार होती. हा फोन नसल्याने शिक्षणात हे विद्यार्थी मागे पडतील, हे उघड होते. त्यांनी मोबाईल बँक ही संकल्पना राबविली. अनेक लोक मोबाईलचे नवीन मॉडेल बाजारात आल्यानंतर ते विकत घेतात आणि जुना स्मार्टफोन घरातच ठेवतात. असे आधुनिक पण उपयोगात नसलेले मोबाईल एकत्र करून ते गरीब विद्यार्थ्यांना दिल्यास नाममात्र पैशात त्यांची सोय होऊ शकते. तसेच शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत दिले जाऊ शकतात, अशी ही संकल्पना आहे. यामुळे घरात पडून असलेल्या मोबाईल्सचा उपयोगही होत आहे आणि गरीब विद्यार्थ्यांची आवश्यकताही पूर्ण होत आहे.