वृत्तसंस्था/ ब्लोमफौंटन
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारच्या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 298 धावांचे आव्हान दिले. भारतीय संघातील कर्णधार प्रियम गर्ग, सलामीचा फलंदाज जयस्वाल आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकांत 4 बाद 297 धावा जमविल्या. भारताची सलामीची जोडी जस्वाल आणि सक्सेना यांनी 71 चेंडूत 66 धावांची भागिदारी केली. सक्सेना 27 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर जस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱया गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. जयस्वालने 74 चेंडूत 8 चौकारांसह 59 धावा जमविल्या. तिलक वर्माने कर्णधार गर्गसमवेत तिसऱया गडय़ासाठी 59 धावांची भागिदारी केली. वर्माने 53 चेंडूत 3 चौकारांसह 46 धावा जमविल्या. कर्णधार गर्गने 72 चेंडूत 2 चौकारांसह 56 धावा जमविताना जुरेलसमवेत 63 धावांची भागिदारी केली. जुरेल आणि वीर यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 60 धावांची भर घातल्याने भारताने 50 षटकांत 4 बाद 297 धावापर्यंत मजल मारली. जुरेल 48 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 52 तर वीर 27 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 44 धावांवर नाबाद राहिले. भारताच्या डावात 2 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे डिसिल्वा, डॅनियल, मधुशंका आणि नदीसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
भारत युवा संघ- 50 षटकांत 4 बाद 297 (जयस्वाल 59, सक्सेना 23, तिलक वर्मा 46, गर्ग 56, जुरेल नाबाद 52, वीर नाबाद 44, डिसिल्वा, डॅनियल, मधुशंका, नेदीसेन प्रत्येकी एक बळी).