मोती चौक, खण आळी, शनिवार चौक, पोवईनाक्यावर वाहतूक कोंडी
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शिवतीर्थावर ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. तेव्हा पासून शिवतीर्थ परिसरात होणारी वाहतूक कोंडी थांबली असली तरी शहरातील खालचा रस्ता, वरचा रस्त्यावर मोती चौक, खण आळी, जुनी मोटार स्टँड परिसर, शनिवार चौक व पोवईनाक्यावर कासट मार्केटसमोर गर्दीच्या वेळी होणाऱया वाहतूक कोंडीने सातारकर पुन्हा त्रस्त झाले आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन काळात शहरातील सर्व रस्त्यांनी अभूतपूर्व अशी शांती अनुभवली होती. लॉकडाऊन काळात तुरळक वाहतूक सोडल्यास वाहतूक कोंडीचा त्रास होत नव्हता. मात्र, आता गेल्या महिन्यापासून अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठा, दुकाने सुरु झाली आणि साताऱयातील वरचा रस्ता, खालचा रस्ता, बसस्थानक परिसरात पुन्हा गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होवू लागली आहे.
साताऱयातील मोती चौक परिसरासह खणआळी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. मोती चौक ते सम्राट चौक परिसरात रस्त्यावर अनेक छोटे विक्रेते गाडय़ा लावून बसलेले असतात. तर सम्राट चौक ते शनिवार चौकापर्यंत देखील अनेक छोटे विक्रेते रस्त्यावरच गाडे लावत असल्याने गर्दीच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्यानंतर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.
शनिवार चौकाच्या पुढे जुन्या मोटार स्टँड परिसराबरोबर चौकात देखील वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित असतील तर ते वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करतात अन्यथा नागरिकच जसा रस्ता उपलब्ध होईल तशी वाहने पुढे सरकवण्याचा प्रयत्न करुन कोंडीतून सुटका करुन घेतात. या परिसरात अनेकदा मोठया वाहनांना ठराविक वेळ दिलेली असताना माल उतरवण्यासाठी मोठी वाहने गर्दीच्या वेळेला रस्त्यात उभी राहिल्यानंतर अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे.
पोवईनाक्यावर कासट मार्केटसमोर वाहतूक कोंडीला अनेक वेळा सामोरे जावे लागते. शिवतीर्थ परिसरात होणारी वाहतूक कोंडी आता संपली आहे. मात्र, कधी कधी ग्रेड सेपरेटरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सातत्याने सुरु असलेल्या वाहतूक कोंडीने तालुक्यातून विविध कामांसाठी येणाऱया नागरिकांसह सातारकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
बेशिस्त पार्किंगचाही फटका
नुकतेच अनलॉक झाल्याने नागरिकांना सम व विषम पार्किंगबाबत अद्याप गांभीर्य आलेले नाही. त्यामुळे वाहतूक शाखेच्या क्रेनने कारवाई केल्यावर तक्रारीचा सूर लावण्यापेक्षा सम व विषम पार्किंगचे नियम पाळल्यास वाहतूक कोंडीला बऱयाच अंशी चाप लागू शकतो. वाहतूक शाखेची क्रेन सातत्याने वाहनांवर कारवाई करत असले तरी काही नागरिक रस्त्यावर वाहन लावून दुकानांमध्ये खरेदीसाठी जातात त्यामुळेही वाहतूक कोंडी होत असते.
बेरोजगारीमुळे रस्त्यावर विक्रेते वाढले
कोरोना स्थितीमुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. लॉकडाऊन असला की घरात बसायचे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर तरी उदरनिर्वाहासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी अनेक बेरोजगार गाडय़ावर काही साहित्य घेवून विक्री करतात. मात्र, या गाडय़ा रस्त्यावर असल्याने त्याचा वाहतूकीस अडथळा होत असतो. तर काही विक्रेते रस्त्याच्या कडेला विक्री करण्यासाठी बसत असल्याने वाहतूकीस त्यांच्याकडूनही अडथळा होत असतो.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील
सातारा शहरात काही ठिकाणी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत असते. त्याला विविध कारणे आहेत. त्या अनुषंगाने रस्त्यावरील विक्रेते तसेच दुकानदारांची अतिक्रमणे असतील ती दूर करण्यासाठी वाहतूक शाखा नेहमीच प्रयत्न करते. शहरात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत. नागरिकांनी वाहने पार्क करताना तसेच रस्त्यावर बसणाऱया विक्रेत्यांनीही शिस्त पाळणे आवश्यक आहे. सम व विषम पार्किंगचे नियम पाळण्याचीही गरज आहे.