सकाळी खरेदीसाठी होणारी गर्दी ठरतेय धोकादायक : नियमावलीचे होतेय उल्लंघन, नियंत्रण आणणे आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी शहरात सकाळी 6 ते 10 या वेळेत होणारी गर्दी पाहता लॉकडाऊन जाहीर करण्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. जनतेला लागणाऱया जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सरकारने सकाळी 6 ते 10 या वेळेत सवलत दिली आहे. परंतु तीच धोकादायक ठरेल की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाली आणि लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू झाल्या. निवडणुका संपल्या आणि अंदाजाप्रमाणे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र यंदाच्या लॉकडाऊनमध्ये सकाळी 6 ते 10 या वेळेत खरेदीसाठी सवलत देण्यात आली. परंतु या वेळेत खरेदीसाठी होणारी गर्दी, मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन पाहता कोरोना रोखणे शक्मय होणार आहे का, हा प्रश्न आहे.
शहरातील सर्व बाजारपेठा सकाळी 6 ते 10 यावेळेत गर्दीने तुडुंब असतात. खरेदी करताना सामाजिक अंतराचा नियम धाब्यावर बसविला जात आहे. लॉकडाऊन नसताना दिवसभर खरेदीसाठी बाहेर पडणारे लोक आणि आता लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 या वेळेत बाहेर पडणारे लोक यामध्ये फारशी तफावत दिसून येत नाही. गर्दी वाढतीच आहे. त्यामुळे लॉकडाऊनला अर्थ काय उरला, हा प्रश्न आहे.
सरकारचे धोरणच मुळात चुकीचे
सकाळी 6 ते 10 या वेळेत जर इतकी गर्दी होणार असेल तर सकाळी 10 ते 6 अशी जी एरव्हीची वेळ आहे त्यात बदल करण्याचे तरी कारण काय? भाजी आणि अन्य साहित्य खरेदीच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही. ‘ब्रेक द चेन’ यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. पण नागरिकांना त्याचे गांभीर्यच कळालेले नाही असे वाटते. आठवडय़ाच्या शेवटी शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन करायचे व शनिवारपर्यंत खरेदीला मोकळीक देऊन गर्दी निर्माण करायची हे सरकारचे धोरणच मुळात चुकीचे ठरणार आहे.
लॉकडाऊन कोणालाच परवडणारा नाही. उद्योग व व्यवसाय ठप्प होऊनही चालणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाणे हेही रास्त आहे. परंतु आता घरपोच भाजीपाल्याची सोय झाली आहे. दूध व औषधे यांना लॉकडाऊनमधून मुभा आहे. त्यामुळे दररोज खरेदीला बाहेर पडण्यात काय अर्थ आहे. पाच तासात होणारी गर्दी पाहता लॉकडाऊनचे गांभीर्यच हरवून गेले आहे. उद्योग, व्यवसाय व अन्य तातडीच्या सेवा वगळता लॉकडाऊनची कार्यवाही गांभीर्याने होईल, याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.