केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश – सणासुदीत खबरदारीचे निर्देश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्ग झपाटय़ाने वाढत असून, दररोज मोठय़ा प्रमाणावर नवीन बाधित आढळून येत आहेत. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही बाधितांचा आकडा वाढल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शुक्रवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले. या नियमावलीनुसार होळी, ईस्टर आणि ईद यासारख्या उत्सवांच्या वेळी गर्दी नियंत्रित करण्याची सक्त सूचना दिली आहे.
केंद्र सरकारकडून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना सुधारित नियमावली पाठविण्यात आली आहे. तसेच केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाधितांबरोबरच मृत्यूदरही वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. संसर्ग आणि मृत्यूदर कमी करायचा असल्यास गर्दीवर नियंत्रण मिळविणे हाच उत्तम पर्याय असल्याची सूचना भल्ला यांनी केली. सर्व राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच शाळा, उच्च शिक्षण संस्था, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, करमणूक उद्याने, व्यायामशाळा, प्रदर्शन आदी गर्दी होणाऱया ठिकाणांवर कडक नजर ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.
जनजागृती करण्यासाठी अभियान
सार्वजनिक ठिकाणी आणि मेळाव्यात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन केल्यास संक्रमणाची साखळी खंडित होण्यास आणि देशातील कोविड बाधितांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे भल्ला यांनी स्पष्ट केले. तसेच या सर्व व्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस दलाने योग्य पावले उचलण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. वेळप्रसंगी जनजागृतीपर अभियान राबविण्याची सूचनाही भल्ला यांनी केली. सर्व लोकांनी मास्क परिधान करणे आणि सामाजिक अंतर ठेवणे यासारख्या प्राथमिक सूचना पाळल्याच पाहिजेत, असेही त्यांनी बजावले.
देशात 59 हजार नवे रुग्ण
देशात गुरुवारी 59 हजार 118 नवे रुग्ण सापडल्यामुळे एकंदर बाधितांचा आकडा 1 कोटी 18 लाख 46 हजार 652 वर पोहोचला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांमधील आकडेवारी पाहता देशात कोरोनामुळे 257 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 60 हजार 949 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 32 हजार 987 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 64 हजार 637 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बाधितांचा आकडा वाढल्याने सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली असून हा आकडा शुक्रवारी 4 लाख 21 हजार 066 इतका झाला आहे.