नंदगड / वार्ताहर
गर्लगुंजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गर्लगुंजी वार्डक्रमांक 3 मधून बाळासाहेब यशवंत पाटील हे सामान्य गटातून निवडणूक लढवित आहेत. त्यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत असून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार प्रचारादरम्यान सर्व मतदारांनी केला आहे.
बाळासाहेब यशवंत पाटील म. ए. समितीचे कार्यकर्ते आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवाराला निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून तर गेली अनेक वर्ष त्यांना गर्लगुंजी गावचा म. ए. समितीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. गर्लगुंजी गावच्या रस्ते, पाणी, वीज, शाळा, दवाखाना, अंगणवाडी, विविध विकास कामांसाठी आणि गावच्या प्रगतीसाठी अनेक युवकांनी, ग्रामस्थांनी बाळासाहेब पाटील यांना या निवडणुकीत उभे करून त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे. बाळासाहेबानी आपले आयुष्य केवळ समाजासाठी व म. ए. समितीसाठी खर्ची घातले आहे. भ्रष्टाचाराला व अन्यायाला आळा घालून एक प्रामाणिक सुशासन आणण्यासाठीच या निवडणुकीत उभे आहेत. त्यांना महिलासह, युवावर्ग व जाणकार मंडळींनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून येणाऱया सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बाळासाहेबासारखा एक दूरदृष्टीचा नेता आणि उच्च विचारांचे व्यक्तिमत्व या निवडणुकीत निवडून यावे, असाच या सुशिक्षित गावातील जनतेचा मनोदय आहे. त्या दृष्टीने त्यांचा प्रचारही सुरू आहे. प्रचारात मोठय़ा प्रमाणात मतदार व समर्थकांचा सहभाग होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी दै. तरुण भारतशी बोलताना सांगितले ?.
त्यांच्या निवडणुकी प्रचारात अनेक तरुणांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे तरुणाना रोजगार मिळावा यासाठी रोजगार पूरक योजना गावात राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे व गर्लगुंजी गावातील मुले राज्य व देशपातळीवर चमकावित तसेच गर्लगुंजी-खानापूर व गर्लगुंजी-बेळगाव दरम्यानच्या रस्त्यावर बस व खासगी टेंपो सुविधा सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही बाळासाहेबानी सांगितले.