डागडुजी करून वर्ग भरवण्याचा प्रकार विद्यार्थ्यांसाठी धोकादायक : दखल घेण्याची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील खोल्या झालेल्या जोरदार पावसात शनिवारी रात्री जमिनदोस्त झाल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. एप्रिलमध्ये झालेल्या वादळात दोन वर्गखोल्या कोसळल्या होत्या. उर्वरित तीन वर्गखोल्याही मोडकळीला आल्या आहेत. या वर्गखोल्यांची डागडुजी करून वर्ग भरवण्यात येत आहेत. हे धोकादायक आहे. याबाबत शिक्षण खात्याने त्वरित लक्ष घालून वर्गखोल्या मंजूर कराव्यात, अशी मागणी पालकवर्गानी व एसडीएमसीने केली आहे.
गर्लगुंजी उच्च प्राथमिक शाळेत सात वर्गखोल्या होत्या. त्यातील एप्रिलमध्ये झालेल्या वादळात झाड पडल्याने दोन वर्गखोल्या जमिनदोस्त झाल्या होत्या. उर्वरित चार वर्गखोल्या या नादुरुस्त तसेच गळती सुरू असून ठिकठिकाणी भिंतीना तडे गेले आहेत. दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. या वर्गखोल्यांचे उद्घाटनही करण्यात आले नाही. या वर्गखोल्या शिक्षण अभियानसाठी वापरण्यात येत होत्या. उर्वरित खोल्यांमध्ये शाळा भरवण्यात येते. पहिली ते सातवीपर्यंत 155 पटसंख्या आहे. तर 7 शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. ज्या वर्ग खोल्यांमध्ये शाळा भरविण्यात येते. त्यांचे छत आणि भिंती पूर्णपणे मोडकळीस आले असून धोकादायक स्थितीतच विद्यार्थ्यांना तेथे बसवण्यात येत आहे. थोडीफार डागडुजी करण्यात आलेली आहे. अचानक कोणताही धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यासाठी जिल्हा पंचायत व बीईआंsनी तातडीने याबाबत लक्ष घालून वर्गखोल्या इतर ठिकाणी भरवणे गरजेचे आहे. गर्लगुंजी गाव सुशिक्षीत, प्रगतशील, सधन गाव आहे. माजी आमदार कै. वसंतराव पाटील यांचे हेच गाव आहे. शाळेबाबत निर्णय घेण्यासाठी येथील जागरुक नागरिक परशराम पालकर यांनी बैठक बोलाविली होती. मात्र बैठकीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ही बैठक होऊ शकली नाही.