4 कोटी 95 लाखाचा निधी मंजूर : कंत्राटदाराचे धीम्या गतीने कामकाज सुरू असल्याने नाराजी
वार्ताहर / खानापूर
माऊली मंदिरपासून गर्लगुंजी गावच्या वेशीतून कणवीपर्यंतच्या रस्त्याची पूर्णतः वाताहत झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर या रस्त्याच्या विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 4 कोटी 95 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. सदर कामाचा शुभारंभ होऊनही दोन महिने उलटले तरी काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाले आहे. फारच धीम्या गतीने काम सुरू असल्याने गर्लगुंजी गावातील नागरिकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी सदर काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गर्लगुंजी गावाला जोडणारा बरगाव क्रॉसपासून भंडरगाळीपर्यंतचा रस्ता अनेक वर्षाच्या मागणीनंतर पूर्ण झाला. त्यानंतर भंडरगाळी क्रॉस ते गर्लगुंजी माऊली देवी मंदिरपर्यंत रस्त्याचे काम मागील वषी पूर्णत्वाला आले. पुन्हा तिसऱया टप्प्यातील गर्लगुंजी माऊली देवस्थान गावच्या वेशीतून जाणाऱया कनवीपर्यंतच्या रस्ता विकास कामासाठी चार कोटी 95 लाखाचा निधी मंजूर झाला या कामाच्या शुभारंभाचा नारळ फोडून दोन महिने उलटले तरी कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता विकासाचे काम रखडले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा मातीचा भराव टाकण्यासाठी खोदाई हाती घेतली आहे. पण सदर काम फारच धीम्या गतीने हाती घेण्यात आल्याने याचा त्रास रस्त्यालगत असलेल्या नागरिकांना होत आहे रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे दुचाकी धारकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय गावच्या प्रमुख चौकात दुतर्फा दुकानांची गर्दी व भाजीपाला विकणाऱयांची गर्दी अधिक असते. परंतु रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे अनेकांना वाट काढताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर अनेक बसेस ही धावतात. परंतु, रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या विकासाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.