ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात 15 जूनला मध्यरात्री भारत-चिनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान मारले गेले होते. तर 70 जवान जखमी झाले होते. या संघर्षात चीनचे किती सैन्य मारले गेले याबाबत चीनने अद्याप मौन बाळगले होते. मात्र, चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि शहीद झालेल्या या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर केला. त्यानंतर ही बाब समोर आली.
भारत-चीन सैन्यातील रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. या संघर्षात किती सैन्य मारले गेले, अथवा जखमी झाले याची चीनने कुठेही वाच्यता केली नव्हती. दरम्यान, लडाखमधील सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात वरिष्ठ लष्करी पातळीवर बैठका सुरू होत्या. अखेर या वादावर तोडगा निघाल्याने दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेतले.