ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जूनच्या मध्यरात्री भारत-चीनच्या सैन्यांत झालेल्या हिंसक संघर्षात चीनचे पाच सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने पहिल्यांदाच दिली आहे.
मोल्डोमध्ये भारत आणि चीनमध्ये लष्करी-मुत्सद्दी पातळीवरील चर्चा झाली. त्यावेळी चीनने ही कबुली दिली. 15 जूनच्या मध्यरात्री भारत-चीनच्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. या संघर्षात चीनचे किती सैनिक मारले गेले याची माहिती चीनने अधिकृतपणे उघड केली नव्हती. चीनचे 40 सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याचे मात्र, भारतीय गुप्तचर यंत्रणेने म्हटले होते. तर या संघर्षात चीनच्या 43 सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काहीजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती चिनी मीडियाने त्यावेळी दिली होती.
गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या डी-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान हा हिंसक संघर्ष झाला होता. एप्रिलपासून गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यातील तणाव कायम आहे. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोन्ही देशांनी शस्त्रसज्जता ठेवली आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.