संघर्ष वर्षपूर्तीच्या निमित्ताने पराक्रमाच्या आठवणींना उजाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंधरा जून 2020 च्या मध्यरात्री लडाख सीमेवरील गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये तुंबळ संघर्ष झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने या संघर्षात भारताने प्रदर्शित केलेला संयमयुक्त पराक्रम आणि चीनने केलेली केविलवाणी लपवाछपवी यांचा पुन्हा एकदा आढावा घेतला जात आहे. भारतीय सैनिकांनी सर्व नियम आणि करार पाळून केलेले आपल्या सीमांचे निर्धारपूर्वक संरक्षण तसेच चीनची झालेली मोठी हानी याची उजळणी होत आहे.
या संघर्षात भारताच्या 20 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. मात्र, भारताने पारदर्शित्वाचा परिचय देत, आपल्या हुतात्मा सैनिकांची नावे घोषित केली. चीनने मात्र प्रारंभी आपली हानी झाली नसल्याचा दावा केला. तसेच आपल्या मृत सैनिकांची नावे घोषित करण्यासही नकार दिला.
चीनचा कांगावा कायम
संघर्षानंतर आठ महिन्यांनी चीनने आपलेही सैनिक मारले गेल्याची कबुली दिली. तथापि, आपल्या मृत सैनिकांची संख्या भारतापेक्षा कितीतरी कमी आहे, असा कांगावा करण्यास कमी पेले नाही. आम्हाला संघर्ष वाढू द्यायचा नव्हता. आम्ही खरा आकडा उघड केला असता तर भारत सरकारवर अधिक दडपण आले असते, असे सांगून चीनने भारतावर जणू उपकार केल्याचा आव आणला.
चीनचे 45 सैनिक ठार
20 जुलैला अमेरिकेच्या गुप्तचरांनी चीन माहिती लपवत असल्याचा आरोप केला. भारताच्या म्हणण्यानुसार चीनचे 43 ते 45 सैनिक मारले गेले होते. तथापि, चीनने आपल्या मृत सैनिकांच्या दफनाविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अमेरिकन गुप्तचरांच्या माहितीनुसार चीनचे 35 सैनिक मारले गेले होते.
रशियाचा गौप्यस्फोट
अलिकडच्या काळात रशिया आणि चीन यांचे मेतकूट जमले आहे. पुतिन आपले जीवलग मित्र आहेत, असे चीनच्या अध्यक्ष जिनपिंग यांनी वारंवार बोलून दाखविले आहे. याच रशियाची अधिकृत वृत्तसंस्था ‘तास’ने गलवान संघर्षात चीनचे 45 सैनिक मारले गेल्याचा गौप्यस्फोट करून चीनची केंडी केली. नंतर लडाख येथील सैन्याचे उच्चाधिकारी लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनीही या संघर्षात चीनचे किमान 60 सैनिक मृत किंवा गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट केले.
विरोधकांकडून चीनची पाठराखण
गलवान व लडाखमधील इतर संघर्ष बिंदूंवर भारतीय सेनेने चीनला रोखले असताना भारतातील विरोधकांनी मात्र चीनची अप्रत्यक्ष पाठराखण करण्याचा सपाटा लावला होता. चीनने भारताचा 1,300 चौरस किलोमीटरचा प्रदेश बळकावला असा दावा अहमअहमिकेने त्यांच्याकडून केला जात होता. तथापि, तशी वस्तुस्थिती नव्हती. भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा निश्चित नाही. दोन्ही देशांचे सैनिक ज्या स्थानांवर उभे राहतात तीच सीमारेषा मानली जाते. भारत व चीन यांच्या सैनिकांच्या उभे राहण्याच्या स्थानांमध्ये तीन ते चार किलोमीटरचे अंतर असते. याला मानवरहित भूमी किंवा नो मॅन्स लँड म्हणतात. या मानवरहित भूमीत दोन्ही देशांच्या सैनिकांनी येऊ नये, असा अलिखित दंडक असतो. तथापि, चीनने तो मोडून या मानवरहित भूमीत आपले सैनिक घुसविण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे सैनिकही याच मानवरहित भूमीत आले व त्यांनी चीनला आणखी पुढे येण्यापासून रोखले. त्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांच्या अगदी जवळ आले. यातूनच गलवान संघर्ष घडला होता. याचाच अर्थ असा की भारतीय सैनिकांनी भारताच्या ताब्यातील भूमीचा एक इंचही चीनच्या ताब्यात जाऊ दिला नव्हता. नंतर ले. ज. वाय के. जोशी यांच्या मुलाखतीमधून विरोधकांच्या आरोपांचे पितळ नंतर उघडे पडले आणि हा विषय बंद झाला,