प्रतिनिधी /बेळगाव
इंदिरा कॉलनी परिसरातील नळांना पाणी येत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. तसेच येथील काही तळघरात पाणी पाझरत असल्याचे निदर्शनास आले होते. जलवाहिनीच्या गळतीचा शोध घेतला असता गळतीमुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गळती निवारणाचे काम बुधवारी हाती घेण्यात आले.
इंदिरा कॉलनी परिसरातील नळांना व्यवस्थित पाणी येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील पाणी समस्येचे निवारण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिकेला देण्यात आले होते. सातत्याने तक्रारी करूनही या समस्येचे निवारण झाले नव्हते. याच दरम्यान या परिसरात असलेल्या काही तळघरांमध्ये पाणी पाझरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबत तक्रार केल्यानंतर जलवाहिनीला गळती लागल्याचे दिसून आले. जलवाहिनीची खोदाई करून सदर गळतीची दुरुस्ती बुधवारी करण्यात आली.