वाया जाणाऱया पाण्याच्या शुद्धीकरणाचा खर्च नागरिकांच्या माथी : कायमस्वरुपी तोडग्याच्यादृष्टीने कार्यवाही नाही
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध ठिकाणी असलेले व्हॉल्व आणि जलवाहिन्यांच्या गळत्यांद्वारे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते. पण गळती निवारणाकडे पाणीपुरवठा मंडळाकडून लक्ष दिले जात नाही. पाणीपुरवठा मंडळाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करण्यात येणार असल्याने गळती निवारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी नेहरूनगर येथील जलवाहिनीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे.
शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत असते. पण याची दखल पाणीपुरवठा मंडळाकडून घेतली जात नाही. केवळ पाणीपुरवठा करणे आणि बिल वसूल करणे इतकीच जबाबदारी असल्याप्रमाणे पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी वागत आहेत. त्यामुळे शहरातील जलवाहिन्यांद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. गळतीबाबत तक्रार करूनही पाणीपुरवठा मंडळाकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. परिणामी हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. नेहरूनगर येथील मुख्य जलवाहिनीलाच गळती लागली असून, मुजावर कॉम्प्लेक्ससमोर जलवाहिनीद्वारे पाणी वाया जात आहे. येथील जलवाहिनीला वारंवार गळती लागून पाणी वाया जात असते. पण याची दुरुस्ती करून कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
गळती दुरुस्त करण्यापूर्वीच सिमेंट काँक्रीटचा रस्ता
शहरातील व्हॉल्वद्वारे आणि विविध ठिकाणी लागलेल्या गळत्यांद्वारे शुद्ध पाणी वाया जात असते. गोमटेश विद्यापीठासमोर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या जलवाहिनीला गेल्या कित्येक महिन्यांपासून गळती लागली आहे. गळती दुरुस्त करण्यापूर्वीच या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे त्या रस्त्यामधूनही गळतीद्वारे पाणी वाहत आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाकडे असंख्य नागरिकांनी तक्रारी केल्या. पण पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांना याबाबत कोणतेच सोयरसुतक नाही. शहरातील काही भागात पाण्याची समस्या नेहमीच भेडसावत असते. त्या परिसरात पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने कोणतीच उपाययोजना राबविली जात नाही. वास्तविक पाहता गळती निवारण करून वाया जाणारे पाणी नागरिकांना पुरविता येऊ शकते. मात्र पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शुद्धीकरण करून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. याकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च येतो. ही रक्कम बिलाच्या माध्यमातून नागरिकांकडून वसूल करण्यात येते. पण काही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. तरीदेखील बिल भरणा करावा लागतो. त्यामुळे वाया जाणाऱया पाण्याच्या शुद्धीकरण खर्चाचे बिल नागरिकांच्या खिशातून वसूल करण्यात येते. त्यामुळे वाया जाणाऱया पाणी शुद्धीकरणाचा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. विविध ठिकाणी लागलेल्या गळत्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.