हनुमान नगर येथील प्रकार : खर्ची घालण्यात आलेला कोटीचा निधी वाया
प्रतिनिधी /बेळगाव
हनुमान नगर परिसरात असलेल्या खुल्या जागेत ओपन जीम, जलतरण तलाव तसेच उद्यान निर्माण करण्यात आले आहे. मात्र कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलेल्या जलतरण तलावाला गवत आणि झाडा झुडपांनी वेढले आहे. सदर जलतरण तलाव खुले करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील भव्य जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
मुख्यमंत्री शहर विकास योजनेंतर्गत 100 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले होते. या अनुदानातून महापालिकेच्या वतीने उपनगरात तीन ठिकाणी उद्यानांचा विकास आणि जलतरण तलावांची उभारणी केली आहे. मात्र तिन्ही जलतरण तलाव वापरापासून वंचित आहेत. जलतरण तलाव सुरू करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या पण निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभला नसल्याने जलतरण तलावांच्या प्रवेशद्वाराला चार वर्षापासून टाळेच आहे. लक्ष्मीटेकडी येथे उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे काम अपूर्ण आहे. तर हनुमान नगर येथे खुली जीम, उद्यान आणि जलतरण तलाव निर्माण करण्यात आले आहे. येथील सर्व कामे पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे येथील जलतरण तलाव खुले करण्यात आले नाही.
जलतरण तलाव शहरातील मोठा असून, या ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्यासाठी तसेच जलतरणपटुंना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने बनविण्यात आले आहे. मात्र जलतरण तलाव पूर्ण होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप वापरासाठी खुले करण्यात आले नाही. परिणामी या ठिकाणी असलेल्या जलतरण तलावाला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. प्रशस्त जागेत निर्माण करण्यात आलेल्या जलतरण तलावाच्या सभोवती गवत आणि झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच चेंजिंग रूमच्या परिसरात झुडपे वाढल्याने इमारतीला अवकळा प्राप्त झाली आहे. संपूर्ण परिसर झाडा झुडपांच्या विळख्यात सापडले आहे. कोटीचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाची दुरवस्था झाली आहे.
तलाव खुले करण्याची मागणी
जलतरण तलाव खुले करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने केवळ निविदा काढल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पाहता महापालिकेने हे तलाव सुरू करून नागरिकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पण महसूल मिळविण्याच्या दृष्टीने निविदा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियांना प्रतिसाद लाभत असल्याचे आढळून आले आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर जलतरण तलाव खुले करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.