प्रतिनिधी/ बेळगाव
शहर आणि उपनगरात महापालिकेच्या मालकीची 40 हून अधिक उद्याने आहेत. उद्यानांची देखभाल करण्यासाठी माळी व कामगारांची नियुक्ती करून लाखो रुपये खर्च टाकण्यात येतात. पण महांतेशनगर येथील उद्यानातील गवत आणि झाडे झुडपे वाढल्याने लहान मुलांच्या खेळाचे साहित्य गवतामध्ये हरवले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उद्यानांची देखभाल व्यवस्थित होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
महापालिकेने विविध खुल्या जागांमध्ये उद्याने निर्माण केली आहेत. दक्षिण आणि उत्तर भागात अनेक उद्याने आहेत. मात्र मोठय़ा आणि महत्त्वाच्या उद्यानांची देखभाल व्यवस्थित केली जाते. मात्र अन्य उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पण उद्यानाच्या देखभालीकरीता महापालिकेने माळी कामगार व वॉचमनची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी उद्यानातील काही ठरावीक भागातील स्वच्छता राखली जाते. उर्वरित भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बुडा कॉलनी योजना क्र. 51 मध्ये दोन उद्याने निर्माण करण्यात आली आहेत. यापैकी एका उद्यानात खेळाचे साहित्य व इतर क्रीडा उपक्रम राबविण्यात आले आहेत.
दुसरीकडील उद्यानातही विविध साहित्य, बसण्यासाठी आसन व्यवस्था, वॉकिंग पाथ निर्माण करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे येथील कर्मचारी केवळ शोभेच्या झाडांची देखभाल करून दिवसभर आराम करतात. पण उद्यानांच्या सभोवती असलेली झाडे-झुडपे हटवून स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तसेच महांतेशनगर येथील उद्यानाच्या दर्शनी भागातील स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. पण मागील बाजुस असलेल्या भागात स्वच्छता राखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील उद्यानात खेळाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र खेळाच्या साहित्याभोवती वाढलेले गवत व झुडपे हटविण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सुट्टीच्या दिवशी व सायंकाळच्यावेळी मुले खेळण्यासाठी उद्यानात येत असतात. पण येथील खेळाचे साहित्य गवत व झुडपांमध्ये हरवले आहे. उद्यानात गवत व झुडपे वाढल्याने साप, किडय़ांचे वास्तव्य असते. त्यामुळे लहान मुलांना धोकादायक आहे.
उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेकडून लाखो रुपये खर्च घातला जातो. कंत्राट पद्धतीने माळी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर कामगारांना नियुक्त करण्यात आलेल्या उद्यानांची स्वच्छता आहे का? उद्यानांची देखभाल व्यवस्थित केली जाते का? याचे सर्वेक्षण केले जात नाही. उद्यानांची पाहणी करण्यापूर्वीच कंत्राटदाराला बिले अदा करून कामगारांचा पगार दिला जातो. त्यामुळे सदर रक्कम वाया जात असल्याची टीका नागरिक करीत आहेत. प्रत्यक्षात उद्यानांची पाहणी करून बिले अदा करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता महापालिका अधिकाऱयांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. कार्यालयात बसूनच बिले अदा करण्यात येतात. त्यामुळे माळी कामगारांचे फावले आहे. उद्यानांची देखभाल करून स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे..