बातमीदार/ खानापूर
शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱयावर गव्याच्या कळपाने हल्ला केल्याने जुवांव प्रेदु मस्करेन (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
यासंबंधी मिळालेली अधिक माहिती अशी की, जुवांव मस्करेन यांची देसाईवाडा क्रॉस तिवोली येथे शेतजमीन आहे. यावर्षी त्यांनी मिरचीचे पिक घेतले आहे. शेतानजीक जंगल परिसर असल्याने रात्रीच्यावेळी वन्यप्राणी पिकांची नासधूस करीत होते. पिकांची राखण करण्यासाठी मंगळवारी पहाटे ते शेताकडे गेले होते. दरम्यान दबा धरुन बसलेल्या गव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. या घटनेत मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास वडिल घरी न परतल्याने त्यांचा मुलगा शेताकडे गेला असता, वडिलांचा मृतदेह पाहून त्याने हंबरडा फोडला. मृतदेह पाहता वन्य जनावरांनीच त्यांच्यावर हल्ला चढविला असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ग्रामस्थांनी खानापूर पोलीस, वनखाते यांना घटनेची माहिती दिली. दोन्ही खात्याचे अधिकारी, माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर संबंधित अधिकाऱयांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.