नगराध्यक्ष परब यांनी मांडली भूमिका
प्रतिनिधी / सावंतवाडी:
गांजा प्रकरणात सावंतवाडी शहरातील युवकांचा असलेला सहभाग सावंतवाडी शहरासाठी भूषणावह नाही. अशा प्रवृत्तीला पोलिसांनी शहरात थारा देऊ नये, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. या प्रकरणात सध्या पोलीस योग्य तपास करत आहेत. त्यामुळे पोलिसांचे कौतुक करावे लागेल. मात्र, पोलिसांनी योग्य तपास केला नाही, तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असा इशाराही परब यांनी दिला. पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले. गांजाप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आवाज उठविला होता. त्यांनी गांजा ओढणाऱया युवकांना रंगेहाथ पकडून दिले होते. हे प्रकरण गेली आठ वर्षे सुरू आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने याबाबत काय केले, हा प्रश्नच आहे. राज्यात सत्ताधारी असल्याने अशा अवैध धंद्यांचा बिमोड करणे हे त्यांचे काम आहे. शहरातील युवकांचा अशा प्रकरणात सहभाग असणे शहरासाठी भूषणावह नाही. अशा प्रवृत्तींचा बिमोड करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आपले काम करतील. त्यांनी पावले न उचलल्यास आम्ही आमची भूमिका जाहीर करू.
एमटीडीसीच्या कामांची चौकशी करण्यासाठी 15 ऑगस्टला आपण उपोषण करणार आहोत. सत्ताधारी नगरसेवक किंवा अन्य कुणाला उपोषणात सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतील. सत्ताधारी नगरसेवक उपोषणात सहभाग घेतील, असेही परब यांनी सांगितले.
सावंतवाडी नगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत यंदा राज्यात सतरावा आणि जिल्हय़ात प्रथम क्रमांक पटकावला. पुढील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक पटकावू, असे परब यांनी सांगितले. विरोधी नगरसेवकांना कार्यक्रमाला बोलावूनही ते आले नाहीत. ते केवळ राजकारण करत आहेत, असा आरोप परब यांनी केला. शहरात डास निर्मुलनाची मोहीम पालिकेने राबविली असताना राष्ट्रवादी काँग्रेस याप्रश्नी गैरसमज पसरवत आहे, असे सांगत पालिकेने राबविलेल्या मोहिमेचा तपशील आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिला. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, दीपाली भालेकर उपस्थित होते.