काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
प्रतिनिधी/ पणजी
गांजा लागवडीद्वारे राज्यात अमलीपदार्थ व्यवहारास प्रोत्साहन देण्याचा सरकारचा कुटील डाव वेळीच हाणून पाडावा, अशी जोरदार मागणी युवा काँग्रेसने केली असून त्यासंबंधीचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सादर केले आहे.
औषधी उत्पादनात वापराच्या नावाखाली गांजासारख्या बेकायदेशीर पदार्थाची लागवड करण्यास कायदेशीर मान्यता देण्याची योजना सरकारने आखली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे खुद्द आरोग्य खात्यानेच सदर लागवडीस मान्यता मागणारे पत्र कायदा खात्यास पाठविले असून कायदा खात्यानेही सदर प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेतला आहे. त्यामुळे समस्त गोमंतकीयांच्या भूवया उंचावल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
गांजा लागवडीत सरकारला स्वारस्य
कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी जाहीर वक्तव्य करताना आरोग्य खात्यातर्फे विश्वजित राणे हे गांजा लागवडीचा प्रस्ताव विधानसभेत मांडणार असल्याचे म्हटले होते, याची आठवण निवेदनात करून देण्यात आली आहे. यावरून स्वतः राज्य सरकारलाच गांजा लागवडीत स्वारस्य असल्याचे सिद्ध होत असून त्यामुळेच या लागवडीस कायदेशीर मान्यता देण्याची तयारी चालली आहे. परंतु राज्यभरातून झालेल्या जोरदार विरोधामुळेच सध्या सरकारचे मनसुबे उधळले गेले आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी, उत्तर गोवा अध्यक्ष विवेक डिसिल्वा, दक्षिण गोवा अध्यक्ष उबेद खान, अर्चित नाईक, ग्लेन काब्राल, मनोज नाईक, म्हापसा युथ अध्यक्ष हिमांशू तिवरेकर, साईश आरोसकर, रोशन चोडणकर आदींचा समावेश होता. निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव, आरोग्य सचिव, अतिरिक्त कायदा सचिव, पोलिस महासंचालक, उत्तर आणि दक्षिण जिल्हाधिकारी, आदींना सादर करण्यात आल्या आहेत.