काँग्रेस पक्षाची भूमिका : प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
गांजा लागवड कायदेशीर करून त्यास मान्यता देण्याच्या प्रस्तावास काँग्रेस पक्षाने आक्षेप घेऊन विरोध केला आहे. गांजा लागवड कायदेशीर केल्यास युवा पिढी बरबाद होण्याचा धोकाही त्यांनी वर्तवला आहे. सरकारने हा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असून त्याला मान्यता दिल्यास युवावर्गाला घेऊन आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस पक्षाने दिला.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले की, गोव्यातील जनतेसमोर अनेक प्रश्न, समस्या तसेच कोरोनाचे संकट उभे असताना सत्ताधारी भाजप सरकारला गांजा लागवडीस मान्यता देण्याचे विचार सुचत आहेत. अमलीपदार्थला उत्तेजन देण्याचा यामागे कुटील डाव असून हा प्रस्ताव कोणाचा ? त्याची फाईल का फिरते ? याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करावा, अशी मागणी श्री. पणजीकर यांनी केली आहे. गोव्यातील शेतकरी व त्यांची शेती संकटात आहे. त्यांना मदत करायची सोडून सरकारला ही दळभद्री गांजा लागवडीची बुद्धी कशी काय सुचली ? अशी विचारणा श्री. पणजीकर यांनी केली आहे. गोवा हे सध्या अमलीपदार्थांचे मुख्य केंद्र म्हणून बदनाम झालेले असताना व ड्रग्जचा सुळसुळात दिसत असताना गांजा लागवडीस प्राधान्य देणे देण्याती कृती चुकीची असल्याची टीका श्री. पणजीकर यांनी यावेळी केली.
हा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला मान्य नाही आणि तो मान्य करण्यास काँग्रेस पक्ष कदापि समर्थन देणार नाही. त्यास सर्वशक्तीनिशी विरोध करून युवावर्गासह पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा श्री. पणजीकर यांनी दिला आहे. वैद्यकीय वापराचे निमित्त करून सरकार जनतेची फसवणूक व दिशाभूल करीत असून पोलीस मोठय़ा प्रमाणात ड्रग्स जप्त करतात ते कुठे जातात ? अशी विचारणा काँग्रेस पक्षाने केली आहे.