वार्ताहर / उचगांव
करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीने विनापरवाना बांधकामे येत्या सात दिवसात जमीनदोस्त करावीत; तसे झाले नाही तर ग्राम विकास अधिकारी चंदन चव्हाण यांना निलंबित केले जाईल, असे खडेबोल गांधीनगरमधील विनापरवाना बेकायदेशीर बांधकामाबाबत आज सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सुनावले. दरम्यान, तीन विनापरवाना बांधकामावर जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली.
सिटी सर्वे नंबर १७२६ सह २२ विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांच्या वतीने अमन मित्तल यांच्या कडे सुनावणीच्या वेळी करण्यात आली. अंकुश वराळे, राजू कांबळे, हिरालाल गळीयल, आप्पासाहेब कांबळे यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर श्री मित्तल यांनी या बांधकामावर सात दिवसांच्या आत कारवाई करा व त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांना दिला. या कारवाईत कुचराई केल्यास निलंबित करण्यात येईल, असा इशाराही मित्तल यांनी चव्हाण यांना दिला.
दरम्यान, सुनावणीनंतर मोहन बदलानी व अनिल बदलानी यांच्या सिटी सर्वे नंबर १७२६ वरील इमारतीवर जेसीबीच्या साह्याने प्रथम कारवाई करण्यात आली. या इमारतीच्या पायऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी थोडी वादावादी झाली. या इमारतीमधील कूळ असणारी बेकरी चालक महिलेने आम्हाला दोन दिवसाची मुदत द्या, अशी विनंती केली. त्यास ग्राम विकास अधिकारी चव्हाण यांनी होकार दिला; मात्र या मुदतीनंतर कारवाई अटळ असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
यानंतर मनोहर सेवलानी यांच्या सिटी सर्वे नंबर २४९३ वरील इमारतीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या वेळी जेसीबी इमारतीपर्यंत जाण्यास अडथळे येत होते. तिसरी कारवाई मनोहर जसुजा यांच्या सिटी सर्वे नंबर १९६५ वरील इमारतीवर करण्यात आली. संपूर्ण विटेचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाकडील काकासाहेब हावळ, गजानन पाटील, अरविंद तामगावे, निवास लोखंडे, अरुण अवघडे, राजू एटाळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी कारवाईत सहभागी झाले.
उर्वरित बांधकामावर कारवाई अटळ
उर्वरित विनापरवाना बांधकामावर येत्या सात दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल. यापुढे कुणीही विनापरवाना अगर बेकायदेशीर बांधकाम करू नये, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी केले.