उचगाव / वार्ताहर
सक्तीने वीज कनेक्शन तोडणी थांबवावी यासह विविध मागण्यांचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने उंटावरून धडक मोर्चा काढून गांधीनगर महावितरणचे शाखा अभियंता अतुल सुतार यांना देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी केले.
राज्य शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, वीज ग्राहकांची तोडण्यात आलेली वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यात यावीत, जे ग्राहक वीज बिल भरण्यास तयार आहेत, त्यांना वीज बिल भरण्यासाठी हफ्त्याची सोय करून देण्यात यावी. तसेच वीज वितरण कर्मचाऱ्याकडून नागरिकांना होणारी अरेरेवी थांबवावी, या प्रमुख मागण्यांसाठी दलित महासंघाच्या वतीने गांधीनगरच्या महावितरण कार्यालयावर उंटावरून मोर्चा काढून वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर सत्तेत असणाऱ्या शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
उंटावरून शेळ्या हाकणे सरकारने थांबवावे, तसेच सामान्य जनतेमध्ये विज बिल भरण्यासंदर्भात जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो शासनाने निर्णय घेऊन थांबवावा, अशाही मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. या आंदोलनावेळी नबीसाब नदाफ ,रामभाऊ साळुंखे ,वीरेंद्र भोपळे, अनिल हेगडे ,लखन इंगळे ,ग्रा.प.सदस्य गणेश देवकुळे, निखिल पवार ,अमोल साठे, महेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.