तिघे जखमी, सहा जणांवर गुन्हा दाखल
उचगाव/प्रतिनिधी
गांजा मागण्यावरुन मित्रामित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान चाकू व चॉपर हल्ल्यात होऊन तिघेजण जखमी झाले. निलेश गणपती पांडव उर्फ माया (वय २२), महादेव भिमराव कापले (वय २५, दोघेही रा. गडमुडशिंगी) व प्रथमेश लक्ष्मण कानडे (वय १९, रा. इंदिरानगर, झोपडपट्टी, गांधीनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत दाखल झालेल्या परस्परविरोधी फिर्यादींमध्ये जखमी तिघांसह अभ्या उर्फ सिंघम व दोन अज्ञात अशा सहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, निलेश पांडव व महादेव कापले हे दोघे गांधीनगरमधील एवन बार जवळ बोलत थांबले होते. त्यावेळी प्रथमेश कानडे व त्याचा सहकारी अभ्या उर्फ सिंघम (पूर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही.) या दोघांनी पांडव व कापलेकडे ओढण्यासाठी गांजा मागितला. त्यावेळी महादेव याने मी गांजा ओढत नाही, तू माझ्याकडे गांजा का मागतोस असे म्हटले. त्यानंतर कानडे याने तू गांजा दिला नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही असे दरडावत वादावादी सुरु केली. यानंतर कानडे व अभ्याने महादेवला मारहाण सुरु केली. त्यावेळी महादेवचा मित्र निलेश भांडण सोडविण्यासाठी गेला. यावेळी तू मध्ये पडू नकोस असे दरडावत प्रथमेशने धारदार चाकूने दोन्ही हातावर, पोटावर व पाठीत वार करुन गंभीर जखमी केले.
त्यानंतर महादेवलाही चाकूचे वार करुन गंभीर जखमी केले. या दोघांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबतची फिर्याद जखमी निलेश पांडव यांनी दिली. तर प्रथमेश कानडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, निलेश पांडव, महादेव कापले व अज्ञात दोघांनी चापरने प्रथमेशवर वार करुन जखमी केले. यानुसार निलेश पांडव, महादेव कापलेसह अज्ञात दोघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.