वार्ताहर / उचगांव
कोरोनो महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू असतानाच गांधीनगर व्यापारी पेठेतील काही व्यापाऱ्यांचा संयम सुटत असून दुकाने सुरु की बंद या निर्णयाबाबत येथील व्यापाऱ्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता गांधीनगर होलसेल कापड व्यापारी असोसिएशन व रिटेल कापड मार्केट असोसिएशन व पोलीस प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक होऊन येथील कापड व्यापारी पेठतील (अत्यावश्यक सेवा वगळून) रविवार, दि. 10 मे पर्यंत दुकाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे एकमताने ठरवण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या गांधीनगर व्यापारी पेठेत गेल्या 41 दिवसापासून लाँकडाऊन परिस्थिती कायम आहे. या व्यापारी पेठेत अनेक राज्यातून लोक खरेदीसाठी येतात त्यामुळे ही व्यापारी पेठ सुरु करणे म्हणजे महामारीला निमंत्रण देण्यासारखे होईल.याचे गांभीर्य ओळखून येथील व्यापाऱ्यांनी आणखीन काही दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही व्यवसायांना शर्ती व अटी नुसार व्यवसाय सुरु करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या आदेशानुसार गांधीनगर मधील काही व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी दुकाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे गर्दी वाढू लागल्याने गांधीनगरचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी गांधीनगर व्यापारी पेठेतील असोसिएशनच्या अध्यक्ष व सदस्य बरोबर बैठक करून नियमांचे उल्लंघन होणार नाही अशी खबरदारी घेऊन व्यवसाय सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.
महाराष्ट्रात कोरोनो संशयितांची संख्या वाढत असून व्यापारी पेठेत याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी येथील व्यापाऱ्यांनी याबाबतची खबरदारी घ्यावी असे सूचित केले.त्यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनो महामारीच्या उच्चाटनासाठी आम्हीही प्रशासना बरोबर आहोत अशी ग्वाही देऊन 10 मे पर्यंत येथील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहतील असा निर्णय घेतला. व त्यानंतर परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल असे होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहुजा उपाध्यक्ष अशोक टेहलानी यांनी स्पष्ट केले. यावेळी सुरेश अहुजा, सुरेश टेहलानी, दिलीप कुकरेजा, शंकर दुल्हानि, गोवालदास कट्यार, बक्षाराम दर्डा, मदन मलानी, राजू नरशिंगानी, संतोष आहुजा, भारतीय सिंधू सभेचे सर्व सदस्य, व्यापारी उपस्थित होते.