उचगांव /वार्ताहर
करवीर तालुक्यातील गांधीनगर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे थकित वेतन ताबडतोब द्या; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दलित महासंघाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनास देण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना महामारीमुळे
आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरफाळा भरणेही दुरापास्त झाले आहे. अशा अवस्थेमध्येही कोरोनाचे संकट घेऊन ग्रामपंचायत कर्मचारी कुटुंबाची काळजी न करता ग्रामसेवा बजावत आहेत. वेतन थकीत राहिल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण बनत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ताबडतोब कर्मचाऱ्यांना थकित वेतन देऊन त्यांच्या कुटुंबाची उपासमार थांबवावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, शहराध्यक्ष राजू कांबळे, नबीसाब नदाफ, अनिल हेगडे यांचा समावेश होता. ग्राम विकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले.