उचगाव / वार्ताहर
लॉज मधील लॉकरचे कुलूप तोडून व्यापाऱ्याचे पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गांधीनगर ता. करवीर येथील मन्नत लॉजमध्ये शुक्रवारी घडली. याबाबतची फिर्याद व्यापारी युवराजन वोयीयारम तिरूथानी रा. अराकोनम, तामिळनाडू यांनी शुक्रवारी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी युवराजन यांचा तामिळनाडू राज्यांमधील अराकोनम गावी हॅण्डलूम टॉवेल व लुंगी तयार करण्याचा व्यवसाय आहे. ते महाराष्ट्रासह, कर्नाटक आंध्र या राज्यांमध्ये व्यवसाय करतात. ते गुरुवारी रात्री गांधीनगर येथील काही व्यापाऱ्यांकडे मालाची ऑर्डर आणि बिल वसुली कामी आले होते. ते वेगवेगळ्या ठिकाणची वसुली करून गांधीनगर येथील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या मन्नत लॉज येथे विश्रांतीसाठी थांबले होते.
त्यांनी हॉलमधील एक बेड बुक केला. दरम्यान दिवसभर वसूल केलेली रक्कम आपल्या बॅगमध्ये ठेवून तिला कुलूप लावले आणि ती बॅग बेडच्या खाली असणाऱ्या लॉकरमध्ये ठेवली. आणि त्याची किल्ली आपल्या उशी खाली ठेवली. रात्री जेवण करून ते झोपी गेले. त्यांच्या शेजारी इतरही काही लोक राहण्यास होते. शुक्रवारी सकाळी उठून आंघोळ करण्यासाठी ते बाथरूममध्ये गेले त्यानंतर बॅगेतील कपडे काढण्यासाठी लॉकरमध्ये ठेवलेली बॅग पाहिली असता लॉकर चे कुलूप तोडून अज्ञाताने वसूल करून आणलेली पाच लाख तीनशे रुपयांची रोकड बॅग लंपास केल्याचे लक्षात आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित लॉज चे मॅनेजर यांना सांगितली.
त्यावेळी युवराजन तिरूथानी यांनी शेजारी असणारे लोक कुठे गेले याची चौकशी केली त्यावेळी मॅनेजरने ती लोक निघून गेल्याचे सांगितले. आपली रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच गांधीनगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पाहणी केली. पण लॉज मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने कोणताच सुगावा लागला नाही. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.