राहुल यांना आव्हान नको म्हणून मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी निवड : सोनिया गांधी यांचा निर्णय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे ‘ए प्रॉमिस्ड लँड’ हे पुस्तक दुसऱयांदा चर्चेत आले आहे. पुस्तकाच्या एका हिस्स्यात सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल यांचा उल्लेख आहे. राहुल यांच्यासमोर भविष्यात कुठलेच आव्हान उभे राहू नये याच कारणासाठी सोनियांनी मनमोहन यांना पंतप्रधान केल्याचे ओबामांनी नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचा एक हिस्सा सर्वांसमोर आला होता. शिक्षकावर छाप पाडण्यासाठी उत्सुक परंतु विषयात प्रावीण्य मिळविण्याची योग्यता नसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे राहुल असल्याचे ओबामांनी नमूद केले होते.
जात अन् धर्म
26/11 च्या मुंबई येथील हल्ल्यानंतर मनमोहन यांच्यावर पाकिस्तानच्या विरोधात आक्रमणासाठी दबाव होता, परंतु त्यांनी असे केले नाही. पण त्यांना याचा राजकीयदृष्टय़ा फटका बसला. भारतीय जनता पक्ष बळकट होत गेला. भारताच्या राजकारणावर अद्याप धर्म आणि जातीचा पगडा असल्याचा उल्लेख पुस्तकात आहे.
सोनियांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह
सोनियांनी मनमोहन यांना अत्यंत विचारपूर्वक पंतप्रधान केल्याचे अनेक राजकीय जाणकार मानतात. सिंग यांना कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती. परंतु प्रत्यक्षात 40 वर्षीय (तत्कालीन वय) राहुल गांधी यांच्या राजकीय भविष्याला कुठलाच धोका निर्माण होऊ नये, असे सोनियांना वाटत होते. राहुल यांना काँग्रेसची धुरा सोपविण्याची तयारी त्या करत होत्या, असे ओबामांनी पुस्तकात लिहिले आहे.
प्रीतिभोजनाचा उल्लेख
ओबामांच्या सन्मानार्थ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका प्रीतिभोजनाचे आयोजन केले होते आणि यात सोनिया तसेच राहुल यांनीही भाग घेतला होता. सोनिया गांधी बोलण्यापेक्षा ऐकणे पसंत करत होत्या. धोरणात्मक मुद्दा येताच त्या चर्चेचा रोख राहुल यांच्या दिशेने वळवत होत्या. सोनिया हुशार असल्याचे माझ्यासमोर स्पष्ट झाले. तर राहुल हे उत्साही दिसून आले. पदावरून हटल्यावर मनमोहन यांच्यासोबत काय घडणार हे मी जाणत नव्हतो. सोनियांच्या योजनेप्रमाणे ते राहुल यांना सत्ता सोपवतील का हेही कळत नव्हते असे ओबामांनी नमूद केले आहे.
रामायण, महाभारत
बराक ओबामांचे बालपण इंडोनेशियात गेले आहे. तेथील वास्तव्यात म्हणजेच बालपणी ओबामा यांनी रामायण आणि महाभारत ही काव्ये ऐकली आहेत. भारतात 2000 पेक्षा अधिक जातीय समूह असून 700 पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत. 2010 पूर्वी कधीच भेट न दिलेल्या भारताने नेहमीच कल्पनेत एक विशेष स्थान बाळगले होते असे ओबामांच्या पुस्तकात नमूद आहे.