दुरूस्तीच्या कारणास्तव खोदाई करून चारही बाजूने बॅरिकेड्स लावल्याने अडथळा
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला गेल्या महिन्याभरापूर्वी गळती लागली होती. त्यामुळे येथील अरगन तलावानजीक असलेल्या गांधी चौकात दुरूस्तीच्या कारणास्तव खोदाई करण्यात आली. खोदाई केलेल्या चारही बाजूने बॉरिकेड्स लावून संरक्षण देण्यात आले. सदर गळती निवारण्याचे काम पूर्ण होऊन महिना उलटला तरी अद्यापही येथील बॉरिकेड्स न हटविल्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे येथील बॅरिकेड्स हटवून वाहतुकीस मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात शहरातील काही मार्ग बंद असल्याने अवजड वाहने कॅम्पमार्गे गांधी चौक, हनुमाननगर, बॉक्साईट रोड या ठिकाणी वळविण्यात आली होती. यामुळे गांधी चौकातील जलवाहिनीला गळती लागून नागरिकांना पाणीटंचाईला सामेरे जावे लागले होते. त्यामुळे येथील दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र सदर काम पूर्ण होऊन देखील याठिकाणी असलेले बॅरिकेडस् न हटविल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गांधी चौकपासून ते अरगन तलावाकडे जाण्यासाठी या ठिकाणी एकेरी मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याने रहदारीला अडचण निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत असून या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे येथील काम पूर्ण झाले असेल तर या ठिकाणी ठेवण्यात आलेले बॅरिकेडस् हटवावेत आणि वाहतुकीस मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी होत आहे.