एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी : रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाण वाढले
प्रतिनिधी /बेळगाव
अरगन तलाव चौकात (गांधी चौक) जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम करण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्यापही हा रस्ता बंदच आहे. चौकातील एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच याठिकाणी रात्रीच्यावेळी अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा रस्ता कधी खुला होणार, अशी विचारणा वाहनधारक करीत आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अरगन तलाव चौकात मोठय़ा प्रमाणात गळती लागली होती. राणी चन्नम्मा चौकातील डॉ. आंबेडकर उद्यानातील जलकुंभात पाणीसाठा करण्यासाठी लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रातून मोठी जलवाहिनी घालण्यात आली आहे. पण अरगन तलाव चौकातून अवजड वाहनांमुळे जलवाहिनीचे नुकसान झाले होते. परिणामी चौकातच गळती लागली होती. सदर गळती निवारणाचे काम करण्यात आले होते. पण काही दिवसांनंतर पुन्हा गळती लागल्याने दुरुस्तीसाठी रस्त्यावर खोदाई करण्यात आली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करून पंधरा दिवस झाले. पण हा रस्ता वाहतुकीसाठी अद्याप बंदच ठेवण्यात आला आहे. याठिकाणी वाहने अडकण्याचा तसेच पुन्हा गळती लागण्याचा धोका असल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.
रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी
सध्या एका बाजूचा रस्ता बंद असल्याने दुसऱया बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. या रस्त्यावरून अवजड व अन्य वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. तसेच बेळगाव-वेंगुर्लामार्गे बस तसेच दुचाकी वाहनेदेखील मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. त्यामुळे चौकातील रस्त्यावर गर्दी होत आहे. काहीवेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच वाहनचालकांना वळसा घालून जावे लागत असल्याने अडचण निर्माण होत आहे. पंधरा दिवसांपासून रस्ता बंद असल्याने गैरसोय झाली आहे. त्यामुळे येथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यास रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.