विरोधी पक्षांचे नेते निमंत्रित : काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्न उपस्थित : जी-23 नेत्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी रात्री विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्वतःच्या वाढदिवसानिमित्त स्नेहभोजन (मेजवानी) दिले आहे. या मेजवानीयुक्त बैठकीत केंद्र सरकारची कोंडी करण्याचा आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकजूट होण्याचा मुद्दा चर्चिला गेला, पण या मेजवानीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणाऱया गांधी परिवाराचा कुठलाच सदस्य सामील झाला नाही.
काँग्रेस खासदार राहुल गांधी श्रीनगरच्या दौऱयावर असताना आणि प्रियंका वड्रा विदेशात असताना या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. या मेजवानीवेळी पुन्हा एकदा काँग्रेसमधील बदलांचा मुद्दा उपस्थित झाल्याचे समजते. गांधी परिवाराने नेतृत्व सोडले तरच काँग्रेसचा कायापालट होणे शक्य असल्याचे काही नेत्यांनी म्हटले आहे. गांधी परिवाराच्या ‘तावडी’तून सुटल्याशिवाय काँग्रेस बळकट होणे अवघड असल्याचे विधान शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी केले आहे.
सिब्बल यांच्यासमवेत काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी मागील वर्षी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षात मोठे बदल करण्याची गरज असल्याचे सुचविले होते. यामुळे या मेजवानीचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सिब्बल यांच्या या मेजवानीत पी. चिदंबरम, शशी थरूर आणि आनंद शर्मा यांनी भाग घेतला आहे. या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली
आहे.
अकाली दलाच्या नेत्याची हजेरी
सिब्बल यांच्या या मेजवानीत राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राउत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ‘ब्रायन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ल्ला, द्रमुकचे तिरुचि शिवा तसेच रालोदचे जयंत चौधरी सामील झाले. तर नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाच्या वतीने पिनाकी मिश्रा यांनीही या मेजवानीत हजेरी लावली. तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसचे नेतेही सिब्बल यांच्या मेजवानीत उपस्थित होते. सिब्बल यांनी पहिल्यांदाच अकाली दलाला निमंत्रित केले होते. अकाली दलाच्या वतीने नरेश गुजरात सामील झाले. कृषी कायद्यांच्या मुद्दय़ावरून अकाली दलाने मागील वर्षी रालोआला सोडचिठ्ठी दिली आहे.
एकजूट करण्याचा प्रयत्न
विद्यमान सरकारच्या काळात सर्व संस्थांचे खच्चीकरण करण्यात आल्याचे म्हणत सिब्बल यांनी सर्व विरोधी पक्षांना स्पष्ट दृष्टीकोन बाळून एकत्रित काम करावे लागणार असल्याचे सांगितले आहे. तर काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यास विरोधी पक्षही मजबूत होतो. काँग्रेसच्या मजबुतीसाठी कुठली पावले उचलली जात आहेत, असे प्रश्नार्थक विधान ओमर यांनी यावेळी केले आहे.
राहुल यांचे बेकफास्ट पॉलिटिक्स
सिब्बल यांच्यापूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ब्रेकफास्ट मीटिंगसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत शरद पवार सामील झाले नव्हते. त्यांच्याऐवजी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाग घेतला होता. त्याचदिवशी पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त झाले होते.