प्रतिनिधी/ पणजी
भारत सध्या राजकीय व सामाजिक संक्रमणातून जात असून हा देश पुन्हा उभारण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पणजीत काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी अनेक पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
आज राज्यांची आणि देशाची झालेली गंभीर परिस्थिती पाहता गांधीजी हयात असते तर खात्रीने त्यांनी पुन्हा एकदा उपोषण केले असते. त्यांचा तो वारसा पुढे नेताना आम्ही आजच्या देशविघातक शक्तींविरोधात लढा दिला पाहिजे. देशाला आज हिंसा परवडणारी नाही, असे श्री. गुंडूराव पुढे म्हणाले.
सत्य लपवून खोटारडेपणाची कास धरणे हाच विद्यमान भाजप सरकारचा पाया आहे, अशा शब्दात श्री. चोडणकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. महात्मा गांधीजींनी अहिंसेचा मार्ग पत्करला, आज सर्वत्र हिंसाच दिसत आहे. उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी सरकारने देश विकायला काढला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांना न्याय मिळत नाही. देशांच्या सीमांकडे तडजोड केली जात असल्याने देशचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे चोडणकर म्हणाले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, एम. के शेख, जॉयल आंद्रादे, व्हिक्टर गोन्साल्विस, रुडाल्फ फर्नांडिस, यांच्यासह अन्य मान्यवरांनीही यावेळी गांधी, शास्त्री यांच्या जीवनावर विचार मांडून श्रद्धांजली वाहिली.