निपाणी शहर, ग्रामीण भागातील चित्र
वार्ताहर/ निपाणी
महाराष्ट्र व केरळ राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. यामुळे राज्यातील सीमावर्ती भागात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. हा धोका टाळण्यासाठी शासनाने गेल्या आठवडय़ापासून विकेंड लॉकडाऊन घोषित केले आहे. या आठवडय़ातही ही कार्यवाही कायम ठेवण्यात आली. शासनाने पूर्ण संसर्ग टाळण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. पण याचे गांभीर्य जनतेमध्ये कोठेच दिसत नाही. यामुळे विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निपाणी शहर व ग्रामीण भागात दिसत आहे.
वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी अनेक अडचणी येतात. पण तेच जर संसर्ग होण्याआधीच उपाययोजना राबवल्या तर त्याचे अनेक फायदे सर्वांनाच होतात. हेच लक्षात घेऊन शासनाने गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनची कार्यवाही सुरू केली. रुग्णसंख्या कमी होताच सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्याला मुभा दिली. आता काही सर्व सुरळीत होत आहे, असे असतानाच केरळ व महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हे लक्षात येताच कर्नाटक शासनाने पुन्हा विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱया नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याविषयी सूचना दिल्या.
सध्या विकेंड लॉकडाऊनची कार्यवाही सुरु आहे. हे करण्यामागचे गांभीर्य लक्षात घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण रोजगाराच्या नावाखाली अनेक व्यवहार सुरूच ठेवले जात आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारे नियमांचे पालन होताना दिसत नाही. शासकीय कार्यालय असो किंवा खासगी आस्थापने असो सर्वत्र बिनधास्तपणे वावरले जात आहे. यामुळे येत्या दिवसात पुन्हा संसर्ग वाढण्याची शक्मयता नाकारता येत नाही. हे सर्वांनी लक्षात घेऊन नियमांचे पालन करणे व शासनाकडून येणाऱया सूचनांचे गांभीर्य लक्षात घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागरिकांची वर्दळ
विकेंड लोकडाऊनची घोषणा करताना शासनाने अत्यावश्यक सेवा दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. पण तरीही अत्यावश्यक व्यतिरिक्त सर्वच दुकाने सुरू ठेवली जातात. नागरिकांची वर्दळ वाढलेली असते. यावर आवर घालताना पोलिसांची दमछाक होत आहे. कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण होत आहे. शनिवारी दुपारी दोननंतर पोलीस प्रशासनाने शहरातून फेरफटका मारताना सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. पण त्याला आवश्यक प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे नागरिकांना संसर्गाचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.