गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या संघर्षात आतापर्यंत 225 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात साठहून अधिक मुले आहेत तर इस्रायलमधील 15 नागरिक ठार झाले आहेत. दोन्ही बाजूचे सुमारे दोन हजार नागरिक या संघर्षात जखमी झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. जमिनीवर हक्क कोणाचा, ज्यूंचा की अरबांचा या प्रमुख वादग्रस्त मुद्दय़ावर इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघर्ष उभा आहे. अगदी इस्रायल हे ज्यू राष्ट्र त्याच्या प्राचीन मूळ भूमीवर अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपियन राष्ट्रांच्या मदतीने 1948 साली स्वतंत्रपणे अस्तित्वात आल्यापासून हा संघर्ष धुमसत आणि पेटत राहिला आहे. या प्रश्नावर युनोमध्ये सातत्याने चर्चा होऊनदेखील तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामी या जगातील प्रमुख धर्मांचे पवित्र स्थान असलेल्या या भूमीवर सातत्याने रक्ताचा शिडकावा होत राहिला आहे.
यावेळी उफाळलेल्या संघर्षालादेखील काही एक प्रकारे पवित्र धार्मिक भावना कारणीभूत किंवा निमित्त ठरल्या आहेत. ताज्या संघर्षाची ठिणगी 13 एप्रिल रोजी पडली. हा दिवस मुस्लिमांच्या पवित्र रमजानचा पहिला दिवस. त्याचप्रमाणे इस्रायली ज्यूंसाठी देशासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या स्मृती जपण्याचा हुतात्मा दिवस. या दिवसाचे औचित्य साधून इस्रायलचे राष्ट्रपती रोवेन रिव्हलीन जनतेला संबोधित करणार होते. हे भाषण ‘पश्चिम भिंत’ म्हणून ओळखल्या जाणाऱया जेरुसलेम येथील ज्यूंच्या पवित्रस्थळी होते. ज्यूंचे हे पवित्रस्थान मुस्लिमांच्या लेखी पवित्र असलेल्या अल अक्सा मशिदीच्या खाली अगदी जवळ आहे. राष्ट्रपतींच्या भाषणादरम्यान मशिदीत होणाऱया प्रार्थनेमुळे भाषणात व्यत्यय येण्याची आशंका इस्रायली अधिकाऱयांना वाटली आणि त्यांनी अल अक्सा मशिदीवर धाड टाकून दमास्कस गेट बंद करून हे भाषण विनाव्यत्यय पूर्ण होईल, याची खबरदारी घेतली. इस्रायली अधिकाऱयांच्या या कृतीमुळे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या हाती आयतेच कोलित मिळाले आणि मग पुढचा भडका उडाला. या संघर्षास जी पार्श्वभूमी लाभली त्या ठिकाणची दोन्ही स्थळे ज्यू आणि पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी का पवित्र आहेत तर इसवी सन 70 साली रोमन साम्राज्याच्या कार्यकाळात ज्यू धर्मियांसाठी पवित्र असणारे मंदिर पाडवण्यात आले होते. परंतु, या मंदिराची पश्चिमेकडील भिंत मात्र या पडझडीत वाचली. त्यामुळे या प्राचीन मंदिराचा ‘पश्चिम भिंत’ हा अवशेष ज्यू धर्मियांना पवित्रस्थानी आहे. सदर मंदिराच्या पायाचे जे स्थान आहे तेथून जग निर्माण झाले अशीही ज्यूंची श्रद्धा आहे. पॅलेस्टिनी मुस्लिमांसाठी अल अक्सा मशीद पवित्र मानली जाते. या श्रद्धांमुळे ही जेरुसलेममधील दोन्ही स्थळे अतिसंवेदनशील आहेत आणि तेथेच ताज्या संघर्षाची बिजे पेरली गेली. अल अक्सा मशिदीचा कारभार शेजारच्या जॉर्डन देशातून चालतो. इथे काही वेळासाठी केवळ मुस्लिमांनाच प्रार्थनेसाठी प्रवेश दिला जातो. मशिदीभोवताली सुरक्षा भिंतही आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही ज्यू कट्टरतावादी या मशिदीच्या अगदी जवळ जाऊन आपल्या प्रार्थना पोलीस बंदोबस्तात करीत असल्याने पॅलेस्टिनींना ही जाणीवपूर्वक चिथावणीखोर कृती वाटते आणि त्यामुळे या भागात ज्यू-पॅलेस्टिनी छोटे-मोठे संघर्ष झडतच असतात. पण आताचा संघर्ष आणि हिंसाचार अलीकडील काळातील सर्वात मोठा मानला जात आहे. कारण, हा केवळ इस्रायली सुरक्षा सैन्य आणि हमास यांच्यातील संघर्ष नव्हता तर इस्रायलने अलीकडच्या काळात कब्जा मिळविलेल्या वेस्ट बँक भागासह मीश्र अरब-ज्यू वस्त्यातही जमाव हल्ल्यात मोठा हिंसाचार झाला आहे.
एकीकडे इस्रायलमधील नेतान्याहू सरकार आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असताना दुसरीकडे हमास ही पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना दीर्घकाळ चाललेल्या पॅलेस्टिनी चळवळीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने सक्रिय झाली आहे. पॅलेस्टिनमध्ये निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि तळागाळात आंदोलने उभी करण्याची हमासची क्षमता याचबरोबरीने पॅलेस्टिनी युवकात ज्यू द्वेष व हिंसाचार पेरण्याचा हमासचा दृष्टीकोन यशस्वी झाल्याचे उदाहरण म्हणून सध्याच्या संघर्षाकडे पाहिले पाहिजे. सुरुवातीचे हल्ले हमासकडूनच झाले. जे इस्रायलला बऱयापैकी अनपेक्षित होते. यामुळेच की काय अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, असे उद्गार काढून इस्रायलच्या प्रत्युत्तरास पाठिंबा दर्शविला होता. एकंदरीत या संघर्षाच्या निमित्ताने दिसलेले हमासचे विकसित स्वरुप पाहता भविष्यकाळात पॅलेस्टिनी प्रश्न जर तेथील निवडणुका व राजकीय माध्यमातून या दहशतवादी संघटनेच्या हाती गेला तर भविष्यात इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाला अधिक हिंसक स्वरुप प्राप्त होण्याची शक्मयता आहे. एकूण परिस्थितीने असे वळण घेण्यास इस्रायलने आतापर्यंत जोपासलेले अरबद्वेष्टे कट्टर राष्ट्रवादी राजकारणही तितकेच जबाबदार आहे.
सुदैवाने हा संघर्ष पराकोटीस पोहचून त्याचा परिणाम साऱया अरब देशांवर व पर्यायाने जगावर होण्यापूर्वी इजिप्त, फ्रान्स, जॉर्डन, अमेरिका यांच्या व युनोच्या मध्यस्थीने त्याला कालच आळा बसला आहे. इस्रायल आणि हमासने शस्त्रसंधी जाहीर केली आहे. या संघर्षाच्या दरम्यान असे दिसून आले की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेतील 57 मुस्लीम देशांची सहानुभूती पॅलेस्टाईनकडे आहे. त्याचप्रमाणे बऱयाच युरोपियन देशांचाही पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे. गेल्या रविवारी या संघर्षाच्या निमित्ताने युनोच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत भारताने पॅलेस्टाईन देशाच्या हेतूला आपला पारंपरिक पाठिंबा पुन्हा एकदा पुनरुच्चारित करताना उभय राष्ट्रांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनचा प्रश्न भौगोलिक, राजकीय व सामाजिक पातळय़ांवर वाटाघाटीद्वारे सोडवावा ही भूमिका स्पष्ट केली. तसे पाहता अलीकडच्या काळात भारत-इस्रायल संबंध अधिक दृढ होण्याच्या दिशेने जात असतानाही भारतास स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या संदर्भातील आपल्या पारंपरिक भूमिकेपासून दूर जाता येत नाही. याची कारणेही तशी स्पष्ट आहेत. एकतर भारत बऱयाच प्रमाणात इंधन व अन्य ऊर्जा स्रोतांसाठी मोठय़ा प्रमाणात अरब राष्ट्रांवर विसंबून आहे. शिवाय युनोच्या सार्वजनिक सभेतील बरीच सदस्य राष्ट्रे ही इस्रायल अतिक्रमणाविरुद्ध पॅलेस्टाईनच्या बाजूची आहेत. यामुळेच की काय, जी पंचवीस राष्ट्रे याप्रसंगी इस्रायलच्या बाजूने उभी राहिली त्यांचा कृतज्ञतेने उल्लेख करताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी भारताचा उल्लेख टाळला आहे.
अनिल आजगावकर