सांबरा ग्रामस्थांचे प्रांताधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर /सांबरा
सांबरा गावच्या मध्यभागी रि. स. नं. 296 मधील 7 एकर 13 गुंठे गायरान जमीन मुस्लीम समुदायास स्मशानभूमीसाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर जमीन कोणत्याही परिस्थितीत स्मशानभूमीसाठी देऊ नये, अशी मागणी सांबरा ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन शुक्रवारी प्रांताधिकारी यांना देण्यात आले. एखाद्या वेळेस सदर जमीन स्मशानभूमीसाठी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याआधी सांबरा विमानतळासाठी येथील 90 टक्के जमीन घेण्यात आली आहे. यामुळे जनावरांना चारण्यासाठी गावातील रि. स. नं. 296 मधील 7 एकर 13 गुंठे गायरान जागा देण्यात आली आहे. याबाबत 27 जुलै 1983 मध्ये दुसऱया दिवाणी न्यायालयात आणि 18 जुलै 1985 मध्ये पहिल्या दिवाणी न्यायालयात सदर जमीन गायरान असल्याचे आदेशात म्हटले आहे. ग्रामस्थांना सदर जमीन सोडून अन्य गायरान जमीन नाही. अशी वस्तुस्थिती असताना रि. स. नं. 296 मधील एकूण 7 एकर 13 गुंठे जमीन मुस्लीम समुदायास स्मशानभूमीसाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रयत्न तात्काळ थांबवण्यात यावेत आणि सदर जमीन गायरानसाठी राखीव ठेवण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून पुढील होणाऱया परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त आणि बेळगावच्या तहसीलदारांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना माजी आमदार संजय पाटील, राजू देसाई, शिवाजी देसाई, सुरेश देसाई, मल्लाप्पा कांबळे, इराप्पा जोई, मनोहर जोई, उमेश मास्तमर्डी, अविनाश परीट, पुंडलिक जत्राटी, राहुल गावडे, धर्मेंद्र तळवार, गजानन पाटील, विनायक परीटसह ग्रामस्थ उपस्थित होते.