पहाडी हल्ल्यात अत्यंत तरबेज सैनिक आघाडीवर उतरवत भारताने केली चीनची कोंडी
थेट भारत- चीन सीमेवरू /शेखर सामंत, सिंधुदुर्ग
अंग गोठवणाऱया थंडीत, उंच उंच पहाडांवर भारतीय सैन्याशी दोन हात करणे आपल्या आवाक्याबाहेरचे असल्याचे लक्षात येताच चीनने आता सीमेवर ‘माईंडगेम’ खेळायला सुरुवात केली आहे. आधुनिक युद्धशास्त्रात यास ‘हायब्रीड वॉर’ म्हणून ओळखले जाते. अचानकपणे सीमेवर हालचाली वाढवणे, अचानक कमी करणे, भारतीय लष्करी अधिकाऱयांसोबत सामंजस्यासाठी बैठका घेणे, दिलेला शब्द न पाळणे, सीमावर्ती भागात मोठय़ा आवाजात हिंदी-पंजाबी गाणी वाजवणे असे नवे खेळ चीन आर्मीने आरंभिले आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय सैन्याच्या हालचाली शांत असल्या, तरी अधिक आक्रमक वाटत आहेत. भारताने उंच पहाडावरील या रणभुमीत पहाडी युद्धात अत्यंत सामर्थ्यवान म्हणून ओळखल्या जाणाऱया स्पेशल प्रंटियर फोर्स, लडाख स्काऊट रेजिमेंटच्या जवानांना उतरविल्यामुळे चीन काहीसा गडबडलेला दिसून येत आहे. भारताच्या बाजूनेही अतिशय मजबूत अशी शस्त्र सज्जता करण्यात आल्यामुळे आता चीनने ‘माईंडगेम’चा अवलंब केलेला दिसत आहे.
दादागिरीला उत्तर आक्रमकतेने
भारत-चीन सीमावर्ती भागात आता बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. तापमान उणे 20 च्या ही पुढे सरकू लागले आहे. रक्त गोठवणाऱया या थंडीत दोन्ही बाजूंच्या लष्कराच्या हालचाली मात्र वातावरण निश्चितच गरम करणाऱया आहेत. आजपर्यंत चीन नेहमीच दादागिरीच्या आणि आक्रमक भूमिकेत दिसून येत असे. या वेळेसही तो तसाच आहे. मात्र यावेळी भारताच्या बाजूने तोडीस तोड प्रत्युत्तर त्याला मिळू लागल्याने तो काहीसा बिथरलेला दिसून येत आहे. नेहमीच्या तुलनेत या कडाक्याचा थंडीत बर्फ अंगावर पडत असला, तरी बर्फात ठाण मांडून असलेले दोन्ही बाजूचे सैन्य तसूरभरही मागे हटायला तयार नाही. मात्र प्रत्यक्ष पहाडावर भारतीय जवानांपेक्षाही चिनी सैनिकांना प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेताना अतिशय कठीण जात असल्याचे दिसून येत आहे.
रणक्षेत्र सरकले पेंगाँन तलावाच्या दिशेने
गलवान घाटीत आक्रमक जोरदार थप्पड बसल्यामुळे बिथरलेल्या चीनने पेंगॉंन तलाव तटवर्ती क्षेत्रातील सामाजिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वपूर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱया फिंगर-8 पर्वतरांगांत घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे. फिंगर-8 पासून फिंगर-5 पर्यंत येऊन चीनचे सैनिक ठेपले आहे. परंतु, भारताने अतिशय आक्रमक हालचाली करून या क्षेत्रातील अती उंचावरील पहाडांचा ताबा घेत चीनच्या आक्रमक हालचालींना चांगलाच लगाम घातला आहे. मात्र दोन्ही बाजूने मोठय़ा प्रमाणावर सैनिकी हालचाली सुरू झाल्याने पेंगाँनपासून ते चिशुलपर्यंतचा परिसर या कडाक्याच्या थंडीतही प्रचंड तापल्याचे दिसून येत आहे.
कुल बट कॉन्फिडंट
लेह-लडाखच्या सीमेवर्ती प्रांतात भारताच्या बाजूने लष्करी हालचाली कमालीच्या वाढलेल्या दिसून येत आहेत. चीन आर्मीचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘ग्लोबल टाईम्स’ मधून भारताच्या विरोधात सातत्याने गरळ ओकली जात असली, तरी भारताच्या बाजूने कमालीचा संयम पाळला जात आहे. ना राज्यकर्ते चीनविरोधात स्टेटमेंटस् देत आहेत, ना मीडिया आक्रमक मूडमध्ये दिसत आहे. पण वास्तवत: सीमावर्ती भागातही भारतीय गोटातील शांतता मात्र वादळापूर्वीची वाटत आहे. या सीमावर्ती भागातील लोकांचेही तेच म्हणणे आहे की, या वेळचा भारत वेगळय़ा मूडचा भारत वाटत आहे. तो शांत दिसत असला, तरी अधिक आक्रमक व आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. चीनच्या प्रत्येक कुरघोडीला या ठिकाणी कुरघोडीनेच प्रत्युत्तर दिले जात आहे. लेहच्या विमानतळावरून सातत्याने लढाऊ विमाने, अत्याधुनिक हॅलिकॉप्टर्स, लष्करी ड्रोनची उड्डाने होत आहेत. रात्रभर ही विमानांची उड्डाने सुरू असतात. तोफा, रणगाडय़ांच्या हालचाली पहाटेच्यावेळी जोरात सुरू असतात. संपूर्ण लडाख खोऱयाला लष्करी छावणीचे स्वरुप आले असून जिकडे-तिकडे लष्कराची हजारो वाहने गस्त घालताना दिसत आहेत.
टेक्नॉलॉजीला उत्तर अनुभवाचे
भारत-चीन सीमेवर रणक्षेत्र हे बारा हजार फुटापासून ते 22 हजार फुटांपर्यंत खूपच उंचावर आहे. या परिसरात आता बर्फ पडायला सुरुवात झाली असून तापमान उणे 20 च्या पुढे सरकले आहे. पुढे ते उणे 30, 35 च्या पुढे जाणारे आहे. वातावरणातील ऑक्सिजनचेही प्रमाण प्रचंड कमी असून श्वास घेणंही मुष्कील बनलं आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत पहाडी भागात टिकाव धरू शकणाऱया सैनिकांची खरी गरज असते. चीनच्या सैन्याला आधुनिकतेचा साज असला, तरी त्यांच्यापाशी अशा दुर्गम पहाडी क्षेत्रात लढण्याचा अनुभव नाही. कारगील युद्धातील अनुभवानंतर भारताने मात्र पहाडी क्षेत्रात लढणाऱया खास सैनिकांच्या तुकडय़ांचीच निर्मिती केली आहे. पहाडी क्षेत्रात कोणत्याही प्रतिकुल वातावरणात चित्याच्या चपळाईने हालचाली करण्यात भारतीय जवानांचा जगात अग्रक्रम लागतो. आपले हे जवान सियाचीनसारख्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रणभूमीत उणे 60 डिग्री वातावरणातही पहाडासारखे उभे असतात. अशा कडव्या सैनिकांना सीमेवरील या उंच उंच पहाडावर भारतीय सेनेने तैनात केल्याने चिनी सैनिकांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.