म्हासुर्ली / वार्ताहर :
धामणी नदीवर गारिवडे – कडवे (ता. गगनबावडा ) गावांच्या दरम्यान या वर्षी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. मात्र बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूस मुख्य रस्त्याची साईट पट्टीची बांधकाम करताना खुदाई केल्याने या ठिकाणी रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन सदर ठिकाणी सध्या सूचना फलक लावण्यायाबरोबर संरक्षक कठडा बांधावा अशी मागणी जनतेनूत होत आहे.
म्हासुर्ली – कोनोली ते कडवे – बावेली हा धामणी खोऱ्यातील प्रमुख इतर जिल्हा मार्ग असून तो पुढे राधानगरी – गगनबावडा या राज्य मार्गाला जोडला गेला आहे. त्यामुळे कोकण, बोरबेट व गगनबावड्याकडे जाणारे पर्यटक या जवळच्या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र इतर जिल्हा मार्ग असलेला कोनोली- कडवे, बावेली रस्ता काही ठिकाणी धामणी नदी पात्रा लगत समांतर जात असल्याने धोक्याचा ठरत आहे. तर धामणी नदी लगतच्या कडवे – गारिवडे दरम्यान पाटबंधारे विभागाने बावेली परिसरातील शेतीच्या पाण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नुकताच बांधून पूर्ण आहे.
मात्र सदर बंधाऱ्याचे बांधकाम करताना नदीच्या पूर्व किनाऱ्यावरील कडवे – बावेली रस्त्याची खुदाई झाली असून डांबरी रस्त्यालगतची साईट पट्टी पूर्णतः नामशेष झाली आहे.परिणामी या ठिकाणी रात्री – अपरात्री रस्ता न दिसल्याने मोठा अपघात होण्याची भीती जनतेतून व्यक्त होत आहे. सध्या वर्षा पर्यटनासाठी याच मार्गावरुन अनेक पर्यटक भरधावपणे वाहने चालवत असल्याने सदर ठिकाण धोक्याचे बनले आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्याबरोबरच संरक्षक कठडा बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.
सूचना फलक लावू..!
सदर बंधाऱ्याच्या ठिकाणी बांधकाम करताना साईट पट्टीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथे वाहतूक करताना धोका होऊ शकतो हे गृहीत धरून या ठिकाणी सूचना फलक लावू. दत्तात्रय डोनपुरे,
कनिष्ठ अभियंता,पाटबंधारे विभाग क्र.२.
योग्य ती खबरदारी घेऊ..!
या ठिकाणी रस्ता नदी लगत आहे. त्यामुळे वाहतूकीच्या दृष्टीने धोक्याचे आहे. तर बंधाऱ्यामुळे साईट पट्टी नामशेष झाली असेल तर पाहणी करुन रस्ता सुरक्षित करण्यास प्राधान्य देऊ व योग्य ती खबरदारी घेऊ. आर.जी.कुरणे, उपअभियंता,पं.स.गगनबावडा,बांधकाम विभाग.
संरक्षक कठडा बांधावा..!
नदी लगत रस्ता असल्याने काही ठिकाणी रस्ता धोकादायक ठरत आहे.तसेच बंधाऱ्या ठिकाणी ही वाहतूक धोकादायक ठरत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी संरक्षण करणे बांधावा. बकस कलोट, ग्रामस्थ.