एपीएमसीच्या प्रतापामुळे आश्चर्य : न्याय देण्याची सोसायटीच्या पदाधिकाऱयांची मागणी : एपीएमसीचे चेअरमन कदम यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसीमध्ये दि बेळगाव गार्डनर्स को-ऑप. सोसायटीची 2 एकर 30 गुंठे जागा आहे. ती जागा 1971 मध्ये खरेदी केली आहे. 1933 मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱयांना बी-बियाणे, भाजीपाला विक्री, कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे असताना एपीएमसी समितीने मात्र त्या सोसायटीच्या गाळय़ासमोरच भिंत उभी करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून याबाबत सोसायटीच्या संचालकांनी आणि शेतकऱयांनी एपीएमसी अध्यक्षांना निवेदन देऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
एपीएमसीमध्ये असलेल्या या गार्डनर्स सोसायटीने 9 दुकाने बांधली आहेत. सदर जागा सोसायटीने खरेदी केली आहे. याबाबत रितसर महापालिकेला कर देखील भरला जात आहे. असे असताना अचानकपणे त्या सोसायटीसमोरच भिंतीची उभारणी करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. वैयक्तिक द्वेशातून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एपीएमसीचे चेअरमन युवराज कदम यांना निवेदन देण्यात आले व आम्हाला योग्य प्रकारे न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन आर. जी. बडमंजी, उपाध्यक्ष सावंत बाळाप्पा पुजारी, संचालक एस. डी. सुप्पण्णावर, व्ही. वाय. कळसण्णावर, मारुती मल्लाप्पा लाड यांच्यासह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चेअरमन युवराज कदम यांनी बुधवारी त्या ठिकाणी जावून पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार अनिल बेनके हे देखील उपस्थित राहणार आहेत.