वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
15 जूनच्या मध्यरात्री चीनशी झालेल्या सशस्त्र संघर्षात पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेल्या 20 भारतीय सैनिकांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नावे कोरण्याची ही प्रक्रिया लवकरच् सुरू करण्यात येणार असून ती पूर्ण होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती सेनाधिकाऱयांनी पत्रकारांना दिली.
पूर्व लडाखमधील गालवन खोऱयात झालेल्या संघर्षात भारताच्या सैनिकांनीही चीनच्या सैनिकांची मोठी हानी केली होती. चीनचे किमान 45 सैनिक ठार झाले होते,असे अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही म्हटले होते. तथापि, चीनने अद्यापही आपल्या मृत सैनिकांची संख्या किंवा नावे घोषित केलेली नाहीत. भारताने मात्र प्रांजळपणे आपली हानी किती झाली हे नावांसकट स्पष्ट केले होते.
हुतात्मा कर्नल बी. संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय सैनिकांनी प्राण गमावून भारताच्या सीमेचे संरक्षण केले होते. या सर्व शूरांचा यथोचित गौरव भारतीय सेनेकडून व केंद्र सरकारकडून होणार आहे. यासाठीच त्यांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली जाणार आहेत.