न्यायालयाने दावे फेटाळल्याने महसूल विभागाकडून हालचाली
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र काही गाळेधारकांनी लिलाव प्रक्रियेस आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने दावे फेटाळल्याने सर्व गाळे ताब्यात घेण्यासाठी महसूल विभागाने हालचाली चालविल्या आहेत. लिलाव करण्यापूर्वी गाळे रिकामी करून ताब्यात घेण्यासाठी बुधवारी सकाळपासून मोहीम राबविण्याची शक्मयता आहे.
गाळय़ांच्या कराराची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करून गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने गाळेधारकांचे दावे फेटाळले असून गाळे रिकामी करून ताब्यात घेतल्यानंतर लिलाव प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने गाळे रिकामी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देऊन गाळेधारकांना नोटीस बजाविली होती. नोटिसीची मुदत संपल्याने गाळे ताब्यात घेण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत.
गाळय़ांचा ताबा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने लिलाव प्रक्रियेनंतर गाळे हस्तांतर करताना वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे गाळे ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया राबविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. बुधवारी सकाळपासून गाळे ताब्यात घेण्याबरोबरच भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महसूल विभागाला यश मिळणार का?
गाळे ताब्यात घेण्यासाठी हेस्कॉम आणि पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. गाळे रिकामी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. तरीदेखील गाळे रिकामी केले नसल्यास महापालिकेकडून साहित्य हटविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया आणि गाळय़ांचा ताबा घेण्याची मोहीम एकाच दिवशी राबविण्याचा विचार आहे. त्यामुळे गाळे ताब्यात घेण्यास महसूल विभागाला यश मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
म. फुले भाजी मार्केटमधील गाळय़ांना भाडेकरू मिळणार का?
58 गाळय़ांसाठी तिसऱयांदा लिलाव प्रक्रिया : उद्या लागणार बोली
महात्मा फुले भाजी मार्केटमधील 58 गाळय़ांचा लिलाव गुरुवार दि. 13 रोजी होणार आहे. सदर गाळय़ांचा लिलाव तिसऱयांदा आयोजित करण्यात येत असून ही लिलाव प्रक्रिया वादाच्या भोवऱयात रखडली होती. त्यामुळे यावेळी तरी भाडेकरू मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी बुधवार दि. 12 पासून लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. सलग 10 दिवस ही लिलाव प्रक्रिया चालणार असून दि. 13 रोजी महात्मा फुले मार्केटमधील गाळय़ांसाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात बोली लावण्यात येणार आहे. यापूर्वी दोनवेळा लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तर पहिल्यावेळी भाजी मार्केट परिसरातच आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेला गाळेधारकांनी विरोध केला. नंतर लिलावात भाग घेऊन बोली लावली. पण अनामत रक्कम भरली नसल्याने लिलाव प्रक्रिया रद्द करावी लागली.
काही गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेऊन गाळे आम्हालाच भाडेतत्त्वावर देण्यात यावेत, असा दावा केला होता. मात्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेने गाळय़ांचा लिलाव आयोजित केला आहे. येथील 58 गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून 20 हजार 600 रुपये अनामत रक्कम प्रत्येक गाळय़ासाठी निश्चित करण्यात आली असून 2 हजार 600 रुपये भाडे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरणा करून लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यापूर्वी दोनवेळा आयोजित करण्यात आलेली लिलाव प्रक्रिया न्यायालयीन वादामुळे रखडली होती. आता आयोजित करण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेवेळी तरी मनपाला भाडेकरू मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.