मंत्री उदय सामंत यांच्या पोलिसांना सूचना
प्रतिनिधी/ चिपळूण
वाशिष्ठी नदीत सुरू असलेल्या गाळ उपशातील डिझेल गैरव्यवहार प्रकरणात कंत्राटी चालकांसह अनेकजण सहभागी आहेत. डिझेल चोरीचे मोठे रॅकेट येथे सक्रिय असल्याने त्याच्या मुळाशी जाण्यासाठी चोरांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जलसंपदा आणि पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत केल्या. प्रकरण घडूनही शांत राहिलेल्या जलसंपदा यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱयांचीही त्यांनी हजेरी घेतली.
वाशिष्ठी नदीत जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून सुरू असलेल्या गाळ उपशात शासनाकडून पुरवण्यात येणाऱया डिझेलच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाच कंत्राटी चालकांना कामावरून काढून टाकण्यात आले असून पेट्रोल पंपावरील 3 कामगारांनाही कामावरून डच्चू देण्यात आला आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त ‘तरुण भारत’मध्ये शुक्रवारी प्रसिध्द झाल्यानंतर चिपळूण दौऱयावर आलेल्या मंत्री सामंत यांनी येथील प्रांत कार्यालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांना विचारणा केली. यावेळी सहाय्यक अभियंता सिध्दांत साठे यांनी सांगितले की, हा प्रकार मार्च महिन्याच्या अखेरीस उघडकीस आला असून त्यामध्ये कंत्राटी चालक व पेट्रोल पंपावरील सहभागी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या कामगारांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे सांगितले. यावर चोरी उघडकीस आल्यानंतर आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नाहीत. चोरी करणाऱया कामगारांना का सोडून दिले, अशी विचारणा केली असता अधिकाऱयांकडून कोणतेही उत्तर दिले गेले नाही. त्यामुळे संतापून मंत्री सामंत यांनी साठे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांना तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
महापुरानंतर चिपळूणच नव्हे तर महाडपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत शासनाकडून गाळ उपसा सुरू आहे. चिपळूणमधील डिझेल गैरव्यवहारप्रकरणी दोषींवर कारवाई झाली तर त्यांचा चांगला परिणाम अन्य ठिकाणच्या गाळ उपशावर होणार आहे. त्यामुळे चिपळुणातील डिझेल चोरी प्रकरण हे गंभीर आहे. यात मोठे रॅकेट गुंतलेले आहे. चोरी करणाऱया कामगारांची खातेनिहाय चौकशी सुरूच राहील. मात्र गुन्हा दाखल होणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तर या प्रकरणाच्या मुळाशी जाता येणार आहे. मुळातच साडेनऊ कोटीचा निधी यासाठी मंजूर आहे. डिझेलमधील गैरव्यवहारासंदर्भात यापूर्वीच आपण अधिकाऱयांना लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही. यात देणाऱयाबरोबरच घेणाराही तितकाच दोषी असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱयांना दिले. या बैठकीला तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता साठे आदी उपस्थित होते.