गोळा करून शासनाला देणार
प्रतिनिधी/ चिपळूण
गाळ काढण्यासाठी सरकार ठोस निधी जाहीर करत नसल्याने आता चिपळूणवासियांनी आपला लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. यातूनच 18 डिसेंबरपासून तीन दिवस बचाव समिती भिक मांगो आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नागरिकांकडून एक-एक रूपया जमा करून ती रक्कम शासनाला गाळ काढण्यासाठी सुपूर्द केली जाणार आहे. 20 रोजी निषेध मुक मोर्चाचेही आयोजन करण्यात आले आहे.
शहर, परिसर उद्ध्वस्त करणाऱया महापुराला गाळाने भरलेली वाशिष्ठी नदी कारणीभूत असल्याने या नदीबरोबरच उपनद्यांतील गाळ काढण्यासह पूरमुक्त चिपळूणसाठी गेल्या 12 दिवसांपासून नागरिक साखळी उपोषणाला बसले आहेत. आतापर्यत विविध बैठका, त्याचबरोबर मंत्रालयीन स्तरावर चर्चाही झाली. यातून 9.56 लाखाचा निधी गाळ काढण्यासाठी मंजूर झाला, मात्र पाटबंधारे खात्याने गाळ काढण्यासाठी 160 कोटीचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल दिला आहे. त्या मानाने मंजूर निधी अल्प असल्याने आणि मागणी करूनही निधीची तरतूद होत नसल्याने संतप्त चिपळूणकरांनी भिक मागून निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारपासून बचाव समितीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांकडे गाळ काढण्यासाठी एक रूपयाची भिक मागण्यात येणार आहे. त्यासाठी दीडशे कॉईन बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. जमा झालेला निधी गाळ काढण्यासाठी सोमवारच्या निषेध मोर्चावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे शासनाला देण्यासाठी सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
सोमवारी निषेध मुक मोर्चा
सोमवारी सकाळी बाजार पूल येथून सकाळी 10 वाजता निषेध मुक मोर्चाला प्रारंभ होणार आहे. हा मोर्चा बाजारपेठ, नगर परिषद, चिंचनाका, बसस्थानकमार्गे प्रांत कार्यालयावर धडकणार आहे.
बुधवारी चिपळूण बंदची हाक!
गेल्या 12 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असतानाही त्याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने 22 डिसेंबर रोजी चिपळूण बंदची हाक शुक्रवारी सायंकाळी सावरकर सभागृहात झालेल्या व्यापारी संघटनांच्या बैठकीत देण्यात आली. यामध्ये बुधवारी शहर व परिसरातील बाजारपेठांचे व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. रिक्षा, वडाप संघटनांसह अन्य संघटनांशीही चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत बापू काणे यांनी प्रास्ताविक तर अरूण भोजने, किशोर रेडीज, शिरीष काटकर यांनी मार्गदर्शन केले.