जातीय तेढ निर्माण करण्याचा एकाचा प्रयत्न : यमनापूर गावकऱयांकडून एकीचे दर्शन : ग्रामस्थांनी गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
यमनापूर गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराचे उद्घाटन व महाप्रसाद कार्यक्रम नुकताच ग्रामस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी चिकन दुकान सुरू ठेवल्याने संतप्त नागरिकांनी दुकानदाराला जाब विचारला. दुकानदाराने जातीय तेढ निर्माण करून माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये गावकऱयांवर फिर्याद दाखल केली. त्यावर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी यमनापूर गावकऱयांसमवेत शुक्रवारी रात्री तातडीची शांतता बैठक घेतली. गावकऱयांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थांनी गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन करत यमनापूर आदर्श गाव असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यमनापूरचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंगेश्वर मंदिर उद्घाटन, कळसारोहण व महाप्रसाद कार्यक्रम नुकताच पार पडला. मंदिर उद्घाटनाच्या आदल्या दिवशी ग्रामस्थांनी गावातील मटण, चिकन, मासळी दुकाने बंद ठेवण्याबद्दल सर्व दुकानदारांना कळविले होते. परंतु मंदिर उद्घाटन दिवशी एका चिकन दुकानदाराने गावातील धार्मिक कार्यक्रमाची पर्वा न करता आपले दुकान सुरूच ठेवले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी व इतर दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली आहेत. तुम्हीही दुकाने बंद करा, अशी विनंती केली. मात्र, त्या दुकानदाराने हिंदू-मुस्लीम जातीय तेढ निर्माण करून ग्रामस्थांवरच माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्याचे ग्रामस्थांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
पडताळणीसाठी माळमारुती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी शुक्रवारी यमनापुरात तातडीची शांतता बैठक बोलावली. गावकऱयांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सत्य परिस्थिती त्यांच्या नजरेसमोर आली. त्यांनी ग्रामस्थांना गुण्यागोविंदाने राहण्याचे आवाहन करत यमनापूर गाव आदर्श गाव असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी उमेश संभाजीचे, रमेश पाटील, बाबाजान मुजावर व इतरांनी यमनापूर गावात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहतात, हे गावचे वैशिष्टय़ आहे. जातीय तेढ निर्माण करून त्या दुकानदारानेच गावच्या आदर्शाला घाला घातला आहे, असेही मनोगत ग्रामस्थांनी या बैठकीमध्ये व्यक्त केले.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन
यमनापूरचे ग्रामस्थ प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मिरशाहवाली दर्गा उरुस मोठय़ा उत्साहात साजरा करतात. यावेळी हिंदुधर्मीय आपले नवस फेडण्यासाठी मिरशाहवाली दर्ग्याला मनपूर्वक भजतात व आपले नवस पूर्ण करून घेतात, असेही मनोगत उपस्थितांतून व्यक्त होताना दिसत होते. बैठकीला माजी महापौर बी. एस. चिकलदिनींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मारुती पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.