प्रतिनिधी / बेळगाव
गावचा सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवल्यास आणि विकास साधायचा असल्यास सर्वांनी पक्षभेद विसरुन एकत्रित काम करणे गरजेचे आहे. एकीच्या जोरावर गावांतील कोणतेही काम अशक्मय नाही. विकासात्मक धोरण अवलंबून स्वच्छता, शैक्षणिक धोरण व इतर बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याचबरोबर अशा कामांत महिलांनी सिंहाचा वाटा उचलण्याची गरज आहे. तेंव्हा गावच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन औरंगाबाद जिह्यातील पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले आहे.
नूतन ग्राम पंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी त्यांनी वरील आवाहन केले. श्री हनुमान मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत माजी सदस्य शामराव पाटील होते. न्यू इंग्रजी स्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीतानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात व त्यानंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने ग्राम पंचायत नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन भाऊ जाधव यांनी तर आभार सुधीर पाटील यांनी मानले.