टी-20 क्रिकेट हा एरवी फक्त फलंदाजांची मक्तेदारी असलेला क्रीडा प्रकार मानला जातो. मर्यादित षटकांच्या या क्रिकेट प्रकारात फलंदाजांचेच अधिराज्य राहिले. पण, याला छेद देण्यासाठी आणि पर्यायाने गोलंदाजांना समसमान बळ देण्यासाठी सुनील गावसकर यांनी उत्तम पर्याय सुचवला आहे. सध्याच्या घडीला टी-20 क्रिकेटमध्ये फारसे बदल करण्याची आवश्यकता नाही. पण, गोलंदाजांनाही समसमान ताकद देण्यासाठी त्यांना एका षटकात दोन बाऊन्सर्स टाकण्याची परवानगी देणे उपयुक्त मुभा आहे.
‘सध्याच्या घडीला सर्व नियम फलंदाजांना अनुकूल आहेत. यामुळे, जलद गोलंदाजांना प्रति षटकामागे दोन बाऊन्सर्स टाकण्याची परवानगी देणे योग्य ठरेल. याचप्रमाणे स्टेडियम प्रशासकांना मान्य असेल तर सीमारेषा आणखी लांब ठेवता येतील. याचप्रमाणे पहिल्या 3 षटकात जर बळी घेतला असेल तर अशा गोलंदाजाला अवांतर षटक टाकण्याची परवानगी देण्याबाबत विचार करता येईल’, असे 71 वर्षीय गावसकर म्हणाले.
गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज 3 ते 5 यार्ड पुढे सरकत असतात. यामुळे, चोरटी धाव पूर्ण करण्यासाठी त्यांना याचा लाभ घेता येतो. असे गैरप्रकार रोखण्यासाठी फलंदाजांना धावांचा दंड करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, याचाही सनीनी उल्लेख केला.
असे प्रकार तिसऱया पंचांच्या नजरेत आले तर त्यांनी फलंदाजांना धावांचा दंड करावा. सध्या टीव्ही पंच गोलंदाजाने नोबॉल टाकला आहे का, हे तपासत असतात. त्याचप्रमाणे गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाजाने क्रीझ सोडली आहे का, हे देखील पाहता येईल. जर फलंदाजाने क्रीझ सोडली असेल आणि त्या चेंडूवर चौकार फटकावला असेल तर त्या संघाच्या खात्यात 4 ऐवजी 3 धावाच नोंदवाव्यात, अशी सनी यांची सूचना आहे.